Subscribe

RSS Feed (xml)

Powered By

Skin Design:
Free Blogger Skins

Powered by Blogger

Friday 30 July, 2010

''ती''

तिला पाऊस खूप आवडतो आणि
मला पावसात 'ती',
तिला बोलायला खूप आवडते आणि
मला बोलताना 'ती',
मला ती खूप आवडते पण.......
तिला नाही आवडत मी !!!!!
म्हणून खड्यात गेला पाऊस आणि
खड्यात गेली 'ती'.....
-संग्रहित

Saturday 10 July, 2010

किशाकाका

लेखक-श्री रवींद्र जोशी
‘आरं काय सांगायचं तुमाला लेकरांनू! यल्लामाच्या यात्रंच्या वेळची गोष्ट. तवा मी असंन पंधरा-सोळा वर्षाचा, पण शरीर काय! जसं लवलवतं पातं! देवीच्या देवळाबाहेर निसती ढोलावर टिपरी पडली न् काय... सरासरा अंगावर काटा आला... अशी सर्वांगातून वीज गेल्यागत झालं का नाई... अन् पायांनं धरला ताल! धरता धरता कधी उटलो आनि नाचायला लागलो त्येच ध्यानात आलं न्हाय. आपसूक मानसांनी भोवती कडं टाकलं आनि मधी मी. नाचाचा जोश जसा वाढत गेला तशी मानसांचं रिंगण आनि मोठं व्हायला लागलं. लय वाढत चालली तशी ढोलाला काय निभतंय! संगती दोन-तीन ताशेवालं आलं आनि त्यांच्या काड्यांनी मात्र बराबर लय साधली; पण आपन काय कमीचं होतो काय? ... अरं काठ्या मोडुस्तवर भिंगरीवानी नाचत राहिलो. मदी मदी ‘यल्लमाच्या नावानं चांगभलं ऽऽऽ!’ असा गर्दीचा नारा फकस्त कानावर येत होता. पाच पन्नास हजार तरी मानसं भोवती बगत असत्याल. घंटाभर कुनाला स्वास घिऊ दिला नाही.’
किशाकाकाची सांगायची पद्धत पार कान टवकारून ऐकण्याजोगी होती, पण सांगता सांगता फार अतिशयोक्ती करायची सवय – त्यामुळं मूळ कथा बाजूला राहून त्या अतिशयोक्तीतल्या आक्रितातच आमची मनं डुंबायची. आता हेच पाहा ना, ‘घंटाभर मानसं स्वास रोखून पहात होती’ म्हटल्यावर मी आणि जाधवाचा विल्या ‘कशी काय माणसं इतका येळ स्वास न् घेता जिती राहिली असतील’ हाच विचार करत होतो. आणि किशाकाकाचा किस्सा केव्हाच पुढे गेला होता. काही का असेना, किशाकाका अशा फार गंमतीजमती सांगायचा. त्याच्या हकीकती आणि त्यानं स्वतःच्या हातानं बनवलेला मटन रस्सा ही दोन आकर्षणं दर आठ-पंधरा दिवसाला त्याच्याकडं खेचून न्यायची.
गावात किशाकाकाचं एकट्याचंच दोन खोल्यांचं बि-हाड. तशी त्याची भावकी फार तालेवार; पण त्यातलं कुणी त्याच्याशी संबंध ठेवून नव्हतं. मला आठवतंय तसा किशाकाका एकटाच होता. मी दहा-बारा वर्षांचा असेन, जाधवांचा विल्या माझ्या वर्गातला. त्याची नि माझी तशी एकदम गट्टी... एकदा मला म्हणाला, “का रं चंद्या, मटन खाऊन बघायचं का येकदा?”
एकदम कावराबावरा होत मी म्हंटलं, “विल्या, तिच्यायला आमच्यात तसलं काही चालत न्हाई... म्हाईत न्हाई व्हय रं तुला?”
“आरं गुळबाट्या म्हनून तर इचारतोय!”
“ह्यॅ कायतरीच काय... लेका आयला कळलं तं जोड्यानं हानंल की मला.”
“तिला कशाला सांगायचं... रातच्याला माझ्या घरी अब्यासाला तुजा डबा घिऊन चल. तितनं फूडं काय करायचं त्ये मी करतो.”
“आरं, पर तुझ्या घरच्यांनी, न्हाईतर आणि कुणी आयच्या कानावर घातलं मंजी?”
“त्येची फिकीर तू करू नगस. बिनधास राहा. काय करायचं ते मी करतो बरोबर.”
तसा विल्या फार ब्येना. माझा त्याच्यावर पूर्ण भरवसा होता आणि म्हणून मी डोळे मिचकावत, ‘मग हुं दे तिच्यायला!’ असा होकार दिला.
रातच्याला विल्याच मला बोलवायला आला. गावात लाईटी नव्हत्याच; पण अख्या गावातले रस्ते पायाखालचे असल्यामुळे न ठेचकाळता विल्यानं मला किशाकाकाच्या घरी आणलं. बंद दाराबाहेरून विल्याने हाक मारली, “किशाकाका...किशाकाका!” दार उघडून किशाकाकानं आमाला आत घेतलं. आत गेल्या गेल्या मस्त शिजणा-या रश्श्याचा वास नाकात भरला. आईशप्पथ त्याच्या आधी चव पण घेतली नव्हती, पण त्या वासानं एकदम तोंडाला पाणी सुटलं.
“किशाकाका, आज मैतर आणलाय संगतीला. माझ्या वर्गातला... चंद्या!” विल्यानं सांगितलं.
“आरं, मग यिवू द्या की! कोण बामनाचा चंद्या न्हवं... आरं येकी आत!” मला जरा चपापल्यासारखं झालं. किशाकाकानं बाहेरचं दार लावून अडणा घातला. म्हणाला, “बैस बैस रं चंद्या! आरं, काय अवगडू नगंस! हितं आलेलं कुनाला बी कळणार न्हाई.” माजं काळीज जरा स्वस्थ झालं.
“हे बग चंद्या, काळजीचं काय कारण न्हाय. आरं, तुजा बा बी येत होता हितं, वहिनीस्नी चोरून! आरं, ह्ये कालवणच तसं असतंय; पण जगाची रीत पाळायला लागतीय बाबा! जरा गुपचूप करायचं! तुज्या बाचं आणि माजं भावाभैनीचं नातं..”
मी उडालोच. नीटधरनं किशाकाकाकडे पाहिलं. दिवसा गावात दिसायचा तसाच चकचकीत. चापून चोपून नेसलेलं दुटांगी धोतर, पांढरंफेक – नवं वाटावं असं. वरती परीटघडीचा मलमलचा बिनकॉलरचा अंगरखा त्यातून तितकाच स्वच्छ दिसणारा बनियन. काळा कुळकुळीत पण दाढी घो ऽ घोटून अगदी गुळगुळीत ठेवलेला चेहरा. दोन भुवयांच्या मध्ये बारीकशी गंधाची टिकली. मध्ये भांग पाडून दोन्हीकडून नीट वळवलेले कुरळे केस... जरा जास्तीच्या तेलानं कंदिलाच्या उजेडातही चमकणारे. नाकी डोळी नीटस. वास्तविक हे त्याचं रुपडं माझ्याही सरावाचं होतं, पण ‘भावाबहिणी’च्या नात्याच्या उल्लेखानं आता त्याचे हावभाव आणि बोलणं बायकी असल्याचं मला जाणवलं.
“विलासराव, जरा घोंगड्याची पट्टी हाथरा पावण्यास्नी टेकायला.”
विल्यानं अलगत झटकून घोंगड्याची पट्टी अंथरली. आम्ही दोघं त्यावर बसलो.
“विलासरावाचा दोनपारी सांगावा आला. मंग सांजच्यालाच भाकरी करून ठिवल्या. आता थोडी कळ काढा... हुईलच येवढ्यात कालवण.” असं म्हणत, आणखी काय काय मसाला टाकत, कालवण ढवळत तो चुलीपुढं उकिडवा बसला.
“किशाकाका, मी काय मदत करू का?” विल्यानं विचारलं.
“तुला काय येतंय शिंग-या... बरं असं कर, त्या शिंकाळ्यातन चार कांदे काढ.” विल्यानं कांदे काढले आणि मुठीने फोडणार इतक्यात,” शिंग-या, लेका थांब...ती सुरी घे तितली. शिस्तशीर काप... काय गाव जेवनाला आलायास का काय?” किशाकाकानं दटावलं.
मी त्या राहत्या घरावर नजर फिरवली. साधीसुधीच गावठी राहणी, पण एकूणच सगळं स्वच्छ. भांडीकुंडी चकचकीत. हारीनं उतरंड मांडलेली. चुलीपुढं सुद्धा अजिबात पसारा नाही. एकच लाकडी कपाट. कपड्यांचं असावं. दोन्ही दारं व्यवस्थित बंद. एका दारावरचा आरसा लख्ख पुसलेला, एकीकडे किशाकाका हकीकत सांगायला गुंतलेला. “आरं चंदूशेट....” प्रत्येक वेळी नाव घेताना वेगवेगळ्या पद्धतीनं पुकारायची काकाची त-हा..
“तर काय सांगत होतो... एकेकाळी बामनबी यज्ञात हे असले कालवण खायचे. आरं त्याच्यात कसलं आलंय पाप अन् पुन्य?”
किशाकाका अभक्ष्य भक्षणाबद्दलचं माझं मानसिक ध्यैर्य वाढवत होता. काय असेल ते असो, पण त्यादिवशी आपण त्या सामिष भोजनाला जे चाटावलो ते आजअखेर!
नंतरही महिन्या दोन महिन्यांतून एखाद्या दिवशी लहर यायची आणि मग विल्याबरोबर आधी निरोप पाठवुन रात्री गुपचूप किशाकाकाकडं जावून यायचो.
दिवसा किशाकाका गावभर कुठं कुठं फिरत राहायचा. आमच्या आईशीही बोलायचा, “काय वैनी, कसं काय चाललंय?”
“ये रे किशा. बैस. थोडा चहा पिऊन जा.” आई म्हणायची आणि मग गावात कुणाकडं पाहुणे आले, कोण कुठल्या गावाला गेलं, कुणाचं लग्न ठरलं, कुणाचं मोडलं, का मोडलं... वगैरे गाव उचापतीच्या गप्पा चालायच्या. त्याच्या त्या हातवारे करून खुलवून सविस्तर सांगण्यानं आई खुश असायची. मी मात्र घरी किशाकाकाला ओळख दयायचो नाही. त्याचं ते विलक्षण माना वेलावणं, बोलणं मला अशावेळी भलतंच चमत्कारिक वाटायचं. तोही, “काय बॅलीस्टर, निगाला का शाळंत?” असं तेवढ्यापुरतंच माझ्याशी बोलत असे.
एकदा तो गेल्यावर मी कुतूहलानं आईला विचारलं, “आई, किशाकाकाचं असं का गं वागणं बोलणं? एवढा मोठा झाला तरी एकटाच राहतोय! लग्नबिग्न कसं झालं नाही गं झालं त्याचं?”
“असतं बाबा एकेकाच्या नशिबात...” आणि पटकन सावरून म्हणाली, “ तुला नाहीत्या चौकशा कशाला हव्यात?... आपली आपली शाळा अन् अभ्यास बघ जा.”
किशाकाकाकडं महिन्या – दोन महिन्यातून राबता चालूच होतं. आता हळूहळू किशाकाका त्याच्या रसाळ गावगप्पांत आम्हाला गावातल्या भानगडीही सांगू लागला. आमचंही वय अशा विषयांच्या कुतुहलाचं झालं होतंच.
“आरं, काय सांगावं बेन्यांनू तुमाला... आपलं सरपंच...” आणि मग आवाजातला स्वर काढून घेऊन कुजबुजायला लागला, “कुटं अजिबात बोंबलणार नसलात तं सांगतो.”
“असं काय किशाकाका, तुमची शपथ!” आम्ही दोघंही एकाच वेळी बोललो. पुढची भानगड ऐकायची आमची अनिवार इच्छा होतीच.
“तर आपलं सरपंच... लई बाराचं! लेकी उजवल्या, सुना आल्या तरी ह्याची काय मस्ती उतरत न्हाय अजून!”
“काय सांगताय?” विल्या आश्चर्यानं म्हणाला.
“काय ऐकताय!” किशाकाका म्हणाला.
विल्याला असे मधे मधे आश्चर्याचे उद॒गार काढत सांगणा-याचाही उत्साह वाढवण्याची हातोटी चांगलीच साधलेली.
तर परवा काय झाली गंमत... आपल्या गावात ती नवीन नर्सबाई आलीया ना?... गावात नवीन, पण तशी जूनच. तर तिच्याशी जमिवलं की झांगट या गड्यानं!”
“ह्यॅ कायतरीच बोलणं तुमचं!” किशाकाकानं पुढची हकीकत मध्येच थांबवू नये म्हणून विल्यानं दिलेलं प्रोत्साहन.
“तर काय लबाड बोलतोय की काय... परवाचीच गोष्ट. रातीची सामसूम झाल्यावर गुपचूप आलं की तिच्या घरला. मग काय राजेहो... खेळ ऐन रंगात याला आणि दारावर थाप पडायला एकच गाठ!”
कारण नसताना माझी छाती उगीचच धडधडू लागली.
“आता आपल्या बोळकांडीच्या सामनेच तिचा दरवाजा. इतक्या राती कोन दार ठोठावतंय म्हणून मीबी दार उघडून समोर गेलो. बघतोय तं तिच्या दारात सरपंचाची बायको आणि ग्रामपंचायतीचं म्हादू गडी, हातात कंदील धरून.”
“आयला बरोबर पकडलं वाटतं बहाद्दरनीनं!” विल्या म्हणाला.
“न्हाय मर्दानू... ती आली तिच्या सुनंच्या पोटात लई दुखाया लागलंय म्हणून नर्सबाईला बोलवाया.”
“आणि मग?”...विल्याचा प्रश्न.
“मग काय... आत गडबडीनं कशीबशी आवराआवर करून नर्सबाईनं फुडलं दार उगडलं आणि सरपंच मागल्या दारानं पळालं.”
“वाचलं बिचारं.”
“वाचतंय कशानं? नर्सबाईला निगावंच लागलं सरपंचीन बरुबर. घरी जाऊन नर्सबाई बघत्यात तं काय? लगीच धावपळ चालू झाली. म्हादानं डाक्टर-कंपौंडरला बोलावून आणलं. डाक्टर म्हनाला आता हलिवणंबी शक्य नाही. चार बत्या लावा आणि नर्सबाईला दोन विंजक्शनं द्यायला सांगितली. धीर राहीना तसं झोपचं सोंग घिऊन पडलेल्या सरपंचाला बी माडीवरनं खाली बोलावलं आणि झाली काय गंमत... बत्त्या ढॅढॅवकनी पेटल्या तसं समद्यांच्या लक्षात आलं, सरपंच जाड निळ्या काठाचं पातळच धोतर म्हणून नेसलेला आणि नर्सबाई करवतकाठी धोतर साडी म्हणून नेसलेली! त्याच्यायला सुनबाई बिनघोर सुटली, पन सरपंच आणि नर्सबाई मातर जम अडकली!”
किशाकाकाला ‘हे तुमाला कुनी सांगितलं?’, ‘हे तुमाला कसं समजलं?’ असा प्रश्न कधी विचारायचा नसतो. किशाकाकाचा वावर सगळ्या पुरुषांत आणि बाईमाणसांत! त्यामुळं त्याची हकीकत पक्की असणार हे उमजून घ्यायचं असतं.
आता कॉलेजसाठी सात-याला राहायला आलो. मॅट्रिकनं विल्याची फारच अडचण करून टाकली, तसा शिक्षणाचा नाद सोडून तो गावातच शेती आणि रिकामटेकडे उद्योग करू लागला. मलाही आता दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीखेरीज गावी जाणं जमेना; पन प्रत्येक सुट्टीत गावी गेलो की एकदा तरी विल्याबरोबर किशाकाकाकडं रातची मेजवानी व्हायचीच. आता आमची वयं तशी चाबरट झाली होती. किशाकाकानं पस्तीशी ओलांडली होती; पण अजून नटण्या-मुरडण्यात फरक नव्हता.
“काय सांगायचं प्रोफेश्वर तुमाला! या विलासरावाला म्हाईती हैच की ....”
खरं म्हणजे काही माहीत नसलं तरी विलासराव त्याला, ‘तर काय...’ म्हणून पुस्ती द्यायचा.
“मागच्या आठवड्यात... जत्रेस्नं परत येत होतो. कोल्हापूरपतूरच्या येस.टी.त मागच्या शीटवर एक मेजर आणि त्याची बायकू असल्याली. मेजर कसा?... तर तरणाबांड, उंचापुरा, धारदार मिशा, पाणीदार डोळं, एकदम देखना. रुबाबदार. त्याची बायकोबी तशीच गोरीपान, चाफेकळीवानी, एकदम चिकनी. पण झालं काय कोल्हापूर स्टँडला मी पिशवी घिऊन उतरलो आणि इचार केला की अंबाबाईचं दर्सन घिऊनच गावची गाडी गाठावी. स्टँडपास्नं थोडं अंतर आलो आणि मागं वळून बगतोय तं मेजर माज्या मागं बायकू स्टँडवर सामान स्टँडवरच. हा गडी माज्या मागं... मागं...निगालाकी. मनात म्हनलं, ‘काय मानुस अस्तंय एकेक. येवढी दिकनी बाई सोडून आपल्या मागं?’ मी फुडं त्यो मागं, मी फुडं त्यो मागं... करता करता देवळाजवळ आलो, तरी हा मागं हाईच. आता म्हनलं आपनच धारिष्ट्य करायला हवं. मागं वळून हटकारला. म्हनलं, “गड्या इतकी देखनी नार सोडून माज्या मागं का रं बाबा?” तसा म्हणे, “त्या पांढ-या पालीला काय चाटायचंय?” खरं रुपडं हितं तुमच्या जवळ हाय. मी आता येनार तुमच्या संगतीच.” आरं बाबांनो, त्याची समजूत घालून वाटंला लावता लावता नाकी नव आलं माज्या.”
“बाकी खरंच हाय किशाकाका, देखनेपनात मला न्हाई वाटत अख्ख्या तालुक्यात येक बाई बरुबरी करील तुमची!” विलासराव म्हणाला.
प्रत्येक वेळी जेवणाबरोबर असा काहीतरी खमंग किस्सा असायचाच. पूर्वी कालवणाच्या जेवणाचा मी निरोप पाठवत असे. आता मात्र मी गावात आलेलं कळताच एकदा तरी जेवायला येऊन जायचा त्याचा निरोप असे. आता आम्ही वयानं वाढल्यानं, पूर्वीइतकं लपूनछपून, चोरून मारून जावं लागत नसे, पण फारसा गवगवा होण्यासारखं ते ठिकाणही नव्हतं. शिवाय रात्री दोन घंटे उशिरा का असेना पण घरात झोपायला येतोय, इकडं आईचं बारीक लक्ष असे.
कशीबशी पदवी पूर्ण करण्यापर्यंत शिक्षणात माझी मजल गेली. एक-दोन शिक्षण शास्त्रातील कोर्सेस पूर्ण केले आणि नशिबानं साता-यातल्या छोटयाश्या चाळीत माझा संसार स्थिरावला. सुट्टीत इतर काही ट्रेनिंग कोर्सेसनी माझा जीवनक्रम पूर्ण वेढला गेला आणि गावाकडं जाणं लांबणीवर पडू लागलं. आई साता-यात माझ्याजवळ राहाण्यास तयार नव्हती. तिला गाव सोडायचं नव्हतं. साहजिकच कधीमधी तिला भेटायला जायचो. तेवढंच माझं गावी जाणं होत असे. गावात गेल्यावर एकदा तिची ख्वालीखुशाली विचारली, तिचं कमीजास्त पाहिलं की विलासरावाबरोबर त्यांच्या गावउचापती पाहात आणि ऐकत हिंडायला मी मोकळा. प्रत्येक खेपेला एका रात्रीचं फर्मास जेवण आणि रसाळ हकीकतींचा रतीब किशाकाकाकडं असायचाच.
आता मीही मिळवता झालो होतो. आजवर इतक्या वेळा किशाकाकाकडं गेलेलो, साहजिकच किशाकाकाला माझ्याकडं येण्याचा आग्रह करी. किशाकाका विलासरावाबरोबर नक्की येण्याचं कबूल करी, पण कधी फिरकत नसे. विलासराव या ना त्या निमित्तानं माझ्याकडं येत असे. किशाकाकाच्या हातच्या कालवणाची चवच अशी होती, की मी मात्र गावात आल्यावर त्याच्याकडचा रतीब चुकवत नसे.

बाजाराचा दिवस होतं. शाळा सकाळची. शेवटच्या तासाला शिकवत होतो. इतक्यात शाळेचा गडी वर्गाशी आला आणि ताबडतोब घरी बोलावलं असल्याचा निरोप त्यानं दिला. त्यातूनही ‘एवढा तास सुटल्यावर येतोच आहे’ असं सांगण्याचा मी प्रयत्न केला; पण घरून ‘असाल तसे’ येण्याचा निरोप असल्याचं कळलं आणि मग मात्र दम धरवेना. ‘गुरुजींच्यावर काहीतरी संकट आलेलं दिसतंय, वेळ पडल्यास मदत असावी’, या भावनेनं सातवीच्या वर्गातील सात-आठ पोरं मला न सांगता माझ्या मागोमाग निघाली. मी तडक घर गाठलं; तर अंगणात आमच्या दारासमोर चाळीतल्या पोरांची ही गर्दी उसळलेली. बायामाणसं दोन – चाराच्या गटानं दारासमोर यायच्या, तोंडाला पदर लावून खुसखुसून पुढं व्हायच्या. अंगणातल्या उंबराच्या पारावर रिकामटेकडी बाप्ये मंडळी टेकलेली आणि उगंच अधीमधी ‘गपा रं पोरानो’ असं पोरांना शांत करून आतलं संभाषण ऐकण्याचा प्रयत्न करत होती. गर्दीतून वाट काढत दाराच्या आत पोचायला मलाच पाच-सात मिनिटं लागली. काय झालं असावं याचा मला काहीच अंदाज येईना. आत गेलो तर व्हरांडयातल्या बाजल्यावर विलासराव सिगरेट फुंकत बसलेला.
“काय झालं रे?” घाब-याघुब-या मी.
“काय न्हाई पाहुण्यास्नी घिऊन आलोय.”
“कोण पाव्हणं रं?” मी पुन्हा विचारलं.
तोपर्यंत बाहेरची पोरं चेंगराचेंगरी करत थेट दाराच्या आतपर्यंत येऊन भिडली होती.
“ए ऽऽ, चला, चालू लागा आपापल्या घरी. थोबाड फोडीन एकेकाचं आता दाराशी थांबलात तर!” उसनं अवसान आणलेला मी ओरडलो.
पोरं पळाली, पण दारासमोर थोडं अंतर टाकून तशीच बाहेर रेंगाळली. मला पटकन काय करावं काही सुचेना. मी धाडकन दार लावून घेतलं आणि आत गेलो. मधल्या खोलीत कुणीच नव्हतं. आत स्वयंपाकघरात गेलो. स्वयंपाकाच्या ओट्याशी किशाकाका भाजी चिरत उभा होता.
“काय किशाकाका.... केव्हा आलात?”
“झाला की घंटाभर.”
मी चाहूल घेतली. बायकोचा कुठंच पत्ता दिसेना. मला काय बोलावं ते सुचेना. त्यातही स्वतःला सावरून म्हटलं, “बरं झालं एकदा आलात ते आणि ‘ही’ कुठे गेली? तुमची गाठ पडली की नाही?” मी विचारलं.
“आमी आलो तवा घरीच होत्या की... विलासरावानं वळखबी करून दिली. त्यांनी चांगला चा करून दिला आणि दळण घिऊन येते म्हणून भायेर गेल्या. दळनाला बराच उशीर लागलेला दिसतोय. तवा म्हनलं निसतं बसून तरी काय करायचं? म्हनून भाजी करायला घेतली. म्हनलं आपल्या हाताची टेस तरी बघूद्या त्यास्नी!”
हातवा-यांत आणि अंगविक्षेपांत भलतीच भर पडल्याचं मला जाणवलं. आता काही इलाज नव्हतं. आल्या प्रसंगाला तोंड देणं भाग होतं.
“आरे, पण... आल्या आल्या तुमी कशाला लागायचं कामाला काका? माझी बायको सगळं करील की!”
“आरं, वैनींची वळख आता होत असली तरी तुजं घर मला परक हाय का?”
“तसं नव्हे काका पण...”
“पन नाही आणि बिन नाही... जा, भायेरच्या खोलीत तुझ्या मित्रासंगत बोलत बैस जा. वैनी घरी यायच्या आत फर्मास भाजी तयार करून ठेवतो.”
एका दृष्टीनं शक्यतो किशाकाका आत राहिलेला मला हवाच होता. मी व्हरांडयात आलो. दबक्या आवाजात विलासरावाशी बोलू लागलो, “आरं, विल्या, एकदम कसा काय रे उपटलास? आणि तेपण किशाकाकाला घेऊन?”
“मग? त्यात काय झालं? परत्येक वेळेला तूच किशाकाकाला तुज्याकडं यायचा आग्रह करीत नव्हतास का?”
“आरे, पण ते सगळं आपलं रीत म्हणून बोललो, तू ते काय खरं धरून बसलास काय?”
“वा रे बहाद्दर! ही तुमची शहरी चाल आमा आडाण्याच्या लक्षात येना. मला खरंच वाटलं त्ये.” विल्या पक्का ब्येना – हे मला लहाणपणापासून माहीत होतं.
“राहुदे त्ये आता आलाच आहात तर. पुढचा काय बेत तुझा?”
“काय काळजी करू नकोस. जेवण झाल्या-झाल्या मी जाणार आहे कलेक्टर कचेरीत आणि मग तसाच गावी जाईन.”
“आणि किशाकाका?” माझ्या घशात आवंढा अडकला.
“राहिल की दोन-चार दिस आरामशीर हितंच. तूच त्याला म्हनला होतास न्हवं. येईल मागून गावाला, हितं कटाळा आल्यावर!”
“हे बघ विल्या, पाया पडतो तुझ्या. परतीच्या भाड्याचे, पायजे तर टॅक्सीचे पैसे देतो तुला, पण किशाकाकाला तेवढं परत घेऊन जा.”
“मला आणि किशाकाकाला एका टॅक्सीत आलेलं बगून गावात वरातच काढत्याल की आमची!”
“आरं, बघतोस तू ...घंटाभरातच माझी एवढी अब्दा झालीय.दोन चार दिवसांत काय अब्रुची दैना होईल याचा जरा विचार कर रे!”
विल्या मिश्किलपणे हसला आणि माझी काकुळती बघून, दया येऊन शेवटी म्हणाला, “बरं,बघतो कसं जमतंय ते. तू काय काळजी करू नगोस.”
विल्याकरता ठेवलेला पाण्याचा तांब्या मी उचलला आणि तसाच तोंडाला लाऊन गटागटा संपवला.
तोवर बाहेरून दार वाजलं आणि बायकोची हक आली, “आलात का हो ! मी आहे...दार उघडा.”
बहुतेक मी घरी आल्याची खात्री करून घेऊनच ती आली असावी. आता आणि कुठल्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतंय या भीतीनं मी हळूहळू दार किलकिलं केलं. बाहेर चाळीतल्या पोरांची ही झुंबड उभी. धाडदिशी दार जोरात ढकलून बायको आत आली. तिच्या हातात दळणबीळण काही न्हवतं. माझ्याकडं एक जळजळीत कटाक्ष टाकून दाणादाण पावलं टाकत आत निघून गेली. मीही अपराधी चेहऱ्याने तिच्या मागोमाग आत गेलो.
आता किशाकाका भाकऱ्या बडवत होता. हसत म्हणाला,” वैनी, गिरणीत गर्दी असणार...वाटलंच मला तुमाला उशीर झाला तशी....म्हणलं कणीक न्हाय तर न्हाय...भाकरीचं पीठ होतं की या डब्यात... म्हणलं तवर साताठ भाकरी टाकून घ्याव्या. त्याला काय उशीर...ही शेवटचीच बघा भाकरी. वैनी, पानं घ्या.”
हिनं निमुटपणे पानं घेतली. विलासरावाला हाक मारली. किशाकाका म्हणाला, “ मी आणि वैनी मागून बसतो. तुमी दोघं घ्या आधी जीउन!” मी आणखीच अवघडलो.
किशाकाकाला आमच्याबरोबर जेवायचा आग्रह केला. त्यानं माझ्या बायकोला केला. कधी नव्हे ते आम्ही चौघंही एकदम जेवायला बसलो. वांग्याचा रस्सा म्हणजे अगदी मटण रश्याच्या तोंडात मारील असा झाला होता. फारशी बोलणी झाली नाहीत. पण किशाकाकानं केलेलं जेवण सगळं फस्त झालं. हात धुतले, तशी किशाकाका म्हणाला, “ चला विलासराव... तुमची कामं आटपा मीबी येतो बरोबर. तसचं स्टॅन्डवर जाऊ!”
“का हो किशाकाका? आलात तसं रहा की दोन दिवस!” कितीही सहजपणा आणला तरी माझ्या बोलण्यात मानभावी खोटेपणा होता हे मला मान्य होतं. मी बायकोकडं बघितलं. तिलाही माझ्या बोलण्यातली कृत्रिमता जाणवली होती. ती काहीच बोलली नाही.
“छ्या... छ्या! येडे का खुळे तुमी प्रोफेश्वर!... आवं, गेल्या पस्तीस वर्सांत यात्रा सोडली तर कंदी गावातला, आपल्या घरातला मुक्काम नाही चुकवला. तसं कुटं चैन पडतं का काय? हितं आलो, तुमचा सुखाचा सौंसार बगितला, ह्येच खूप पुन्य आमचं... चला, आटपा विलासराव.”
अंगणातून पाठमो-या जाणा-या किशाकाकाकडं बघत राहिलो. क्षणार्धात त्याच्या माझ्या परिचयाचा चित्रपट माझ्या नजरेसमोर उभा राहिला. खरंच किशाकाकानं नुसतंच खाऊपिऊ घातलं होतं किंवा वेल्हाळ गोष्टी सांगितल्या होत्या असं नव्हे, त्यानं तशी मायाही लावली होती. अनेकदा आई रागावली, शिक्षकांनी वर्गात पाणउतारा केला तर किशाकाकानं हळुवारपणानं माझ्या मनातली अढी काढली होती. विशेष म्हणजे असा काही प्रसंग आला तर त्या रात्री मी हमखास किशाकाकाकडं जात असे. कॉलेजात कधी एखादया मुलीबद्दल आकर्षण वाटल्यास, ‘आब्यासाचं पयलं बगावं माणसानं’ हे मनावर पक्कं ठसवायचा किशाकाकानंच प्रयत्न केलेला.बरं कोणत्याही वेळी त्याच्या समजावण्यात अभिवेष नाही, उपदेशाची आढ्यता नाही, किंबहुना हलक्याफुलक्या आणि समयोचित चुटक्यांनीच त्यानं मनातलं मळभ दूर केलेलं. नोकरीला लागल्यावरही एकदाच मी जेवणाचा खर्च(निदान मटणाचा) देण्याचा प्रयत्न करताच, ‘व्वा श्रीमंत!... त्यापेक्षा आमालाच घ्याकी इकत!’ असं बोलून तेही नाकारले.
लोकांच्यादेखत कधीही सलगी न दाखवून मला ओशाळवाणं होऊ न देण्याची खबरदारीही त्यानं आजतागायत घेतली होती. मीच चारचारदा माझ्याकडं येण्याचा त्याला आग्रह केला होता आणि आज मात्र माझ्या मूर्ख प्रतिष्ठेच्या वाटेत किशाकाका आल्याचं मला वाटलं होतं. खरंच किती कृतघ्न मी! डबडबलेल्या डोळ्यांतून अस्पष्ट झालेली त्याची पाठमोरी मूर्ती दिसेनाशी झाल्याचं भानही मला राहिलं नाही. सावध झालो तो मला बिलगून, माझ्या पाठीवर सांत्वनाचं थोपटणा-या बायकोच्या स्पर्शांनं मला काय बोलावं ते सुचेना. तिच्या हातांच्या तळव्यात तोंड खुपसून ढसाढसा रडून घेतलं. उमाळा कमी झाल्यावर तिला म्हटलं, “फार माया केली गं किशाकाकानं माझ्यावर... आजपर्यंत हे जाणिवेतही नव्हतं. आज कळलं, पण तुझी कुचंबणा नको म्हणून मी त्याला कटवलं.”
“माझी कुचंबणा? हो! खरंच तुम्ही करून टाकलीत. इतकी वर्षं झाली लग्नाला, पण तुमच्या या आप्ताबद्दल एक अवाक्षरदेखील कधी काढलं नाहीत माझ्याजवळ. एकदम घरात आलेल्या अशा माणसाबद्दल माझी दुसरी कुठली प्रतिक्रिया झाली असती? सांगा नं!... खरी कुचंबणा आणि अवघडलेपण आलं तुम्हाला. दोन दिवस त्यांना ठेवून घेण्याची हिंमतपण झाली नाही तुमची.” अवाक् होऊन मी तिच्याकडं पाहात राहिलो.
अपराधी भावनेनं पुढं अनेक दिवस मी गावी जायचं टाळलं. मधे एक-दोनदा आईलाच साता-याला बोलावून घेतलं. अशाच एका सुट्टीत आई आजारी असल्यानं तिला येणं शक्य नसल्याचं कळलं. मी गावाकडं गेलो. या खेपी किशाकाकाचे पाय धरून माफी मागायची ठरवलं होतं.
सकाळी सकाळीच किशाकाकाचं घर गाठलं. बाहेरच्या भिंतीला टेकून, पाय पसरून तो ऊन खात बसला होता. सवयीनं बाकी पोशाखात फरक नसला तरी चेह-यावर पांढरी दाढी खुरट वाढली होती. डोक्यावरचे केस पिकले होते. त्यांचा कुरळेपणा नाहीसा होऊन बरेच मागं हटले होते. किशाकाका म्हातारा झाल्याचं जाणवलं. मला बघताच... ‘येरे... येरे... लेकरा...’ असं म्हणून त्यानं घोंगड्याचा पुढचा पदर पसरला.
मी किशाकाकाचे हात हातात धरले. आता कोण बघतंय आणि काय म्हणतंय याची मला पर्वा नव्हती. किशाकाकाचे डोळे ओलावल्याचं मला जाणवलं. माझे हात थोपटत मला म्हणाला, “चंदूशेठ... काय विलाज न्हाय त्याला. कोनत्या जल्मीचं पाप कोन जाने! परमेसर देतो शिक्षा एकेकाला. बोल कुनाला लावणार? त्यातल्या त्यात एक बरं – मोठया भावकीत जन्माला घातलं त्यानं! लहानपणीच आई-बाप दोगंबी वारली. भावकीची अडचण नको म्हणून मूळ घरापासून चार हात लांब या दोन खोल्या बांधून राहू लागलो. मी असा नामर्द, माझ्या हातनं कायीच धंदापानी, शेती होण्याचं लक्षन न्हाई. भावकीनंच घेतली माझी वाटनी आपल्या ताब्यात; पण एक मातर खरं, जनमभर मला लागणारे कपडे-लत्ते, मला खर्चाला लागणारा पैका, कधी बी कमी पडू दिला नाय. बरं, भावकीत म्हाईत, मला चार-सहा कपड्याच्या जोडांखेरीज आनखी कशाची हौस न्हाई... आणि माणसांना बोलावून चांगलं कालवन खायला घालण्याबिगार दुसरं व्यसन न्हाई. त्यांनी ते मात्तर कदी कमी पडू दिलं न्हाई. –हाता –हायला माणसांची माया... ती ज्या वयात हवी असती त्या वयात वरून दाखवत नसली, तरी समद्यांनी झिडकारलं... कुनीबी मायेच्या उबंला न्हाई उबं केलं. त्येबी माझ्या अंगवळणी पडलं. म्हनलं, जगानं न्हाई माया केली तरी आपण जगावर करायची आणि माझी जगण्याची उमेद वाडली.
पण खरं सांगू लेकरा, आता गाडं थकलं. न्हाई होत पयल्यासारकी उपसाभर! हितंच बसून असतो. गुडगं बी दुकाय लागल्येत मस्त. काय करावंसंच वाटत न्हाई. भावकीतलं कोनी नं कोनी रोज भाकरटुकडा पोचिवत्यात. वर चार पैसं बी पाठीवत्यात. जगाचं चाललंय तसंच चाललंय. माजी बी माया करण्याची शक्ती संपून गेलीया. चंदूशेठ, तुमी का आलायासा त्ये मी वळखलं. पन माज्या मनात आता कायबी रागलोभ न्हाई... तुमी हितवर आला, भरून पावलो. जा तुमी आता.”
किशाकाकाच्या बोलण्यात कुठंही कडूपणा नव्हता. विखार नव्हता. मला माझ्याच वागण्याचा विखार चरचरून झोंबत गेला. पुढं बोलण्यानंही काही फरक पडणार नव्हता. उठलो. घराकडं निघालो. पायात मणामणाच्या बेडया घेऊन....
**************************************************************************
लेखक
श्री रवींद्र जोशी पुणे.
ही कथा श्री रवींद्र जोशी यांच्या ‘गावरान गोष्टी’ या कथासंग्रहात प्रसिद्ध झाली असून मूळ लेखकांच्या लेखी पूर्वपरवानगीने या ब्लॉगवर ‘अरुणोदय’ च्या वाचकांसाठी प्रसिध्द केली आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी. **************************************************************************

Saturday 19 June, 2010

अघळपघळ पण ताठ कोल्हापूर

लेखक-श्री उदय गायकवाड
रांगडेपणाबरोबर गुरगुर आणि मस्ती, रंगेलपणा व शौकीनपणाबरोबर जिवाला जीव देणारी, कौतुकाबरोबरच पाय आडवा घालून पाडण्याची तयारी असलेली, लाल मातीशी घट्ट नातं असणारी व चैनीत, निवांत असे शब्द खऱ्या अर्थाने जगणारी, अघळपघळ मनाची माणसं कोल्हापूरचीच, दुसरी कुठली?
कोल्हापूर. नदी-तलावात मस्तीत डुंबावं, लाल मातीत कुस्ती करावी, स्टार्चचे पांढरे कपडे, लहरी फेटा आणि कर्रकर्र वाजणारी पायताणं घालून मिरवावं अशी इच्छा या कोल्हापुरातला प्रत्येक पुरुष बाळगतो. तसं पाहता, इथं स्त्रिया म्हणजे "बाईमाणसं'देखील मिरवण्यात मागे नाहीत. त्याही सोन्यानं मढलेल्या. जरीकाठी साडी आणि डोक्यावर पदर घेऊन, त्याचं एक टोक हातात धरून हाताची घडी अशा पद्धतीने वावरणाऱ्या. तर सामान्य कष्टकरी वर्गातल्या बायका नऊवारी लुगडं नेसणाऱ्या, डोक्यावर पदर घेऊन त्यावर वैरणीचा भारा किंवा दही-लोण्याच्या भांड्याने भरलेली बुट्टी घेऊन बाजारात जाणाऱ्या. अर्थात 20-25 तोळ्यांचे दागिने सहज त्यांच्या अंगावर चकाकताना दिसतील. कोल्हापुरी साज, चिताक, बोरमाळ, जोंधळी पोत, मंगळसूत्र, हातात बिल्वर, पाटल्या, बांगड्या, बोटात अंगठी, कानात बुगडी, कर्णफूल, कुड्या, वेल पाहायला मिळेलच. इथले पुरुषसुद्धा दागिने वापरण्यात मागे नाहीत. गळ्यात सोन्याची चेन, त्यात अडकवलेलं वाघनख, हातात सोन्याचं कडं, बोटांत अंगठ्या, मनगटात सोनेरी घड्याळ आणि डोळ्यांवर रेबॅनचा गॉगल. इथला सामान्य कष्टकरीसुद्धा बऱ्यापैकी अंगभर कपडे घालून वावरताना दिसतो. पश्चिमेकडचा अतिडोंगराळ भाग आणि सांगलीचा पूर्वेकडील अति दुष्काळी भाग सोडला तर उर्वरित दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात समृद्धी नांदते. हळद, द्राक्ष, ऊस, भाजीपाला, भात अशा पिकांबरोबरच मुबलक पशुधन, हीच इथली समृद्धीची गुपितं. कृष्णा-पंचगंगा तर इथल्या जीवनदायिनी!
ईर्ष्या आणि उत्साह तर कोल्हापूरकरांच्या नसानसांत भिनलेला! घर बांधायचं असो किंवा लग्न-बारसं असो; ते दणकेबाज झालंच पाहिजे, ही इथली मानसिकता. अशा कार्यक्रमात मानापमानाची नाटकं भलतीच रंगतात. शुभकार्याला बहिणीने घराला तोरणं आणून बांधायची, त्याबरोबर पाच-पन्नास मंडळींना पुरेल असा "गारवा' आणायचा. "गारवा' ही तर भन्नाट पदार्थांची रेलचेल. भाकरी, पाटवडी, अंबील, घुगऱ्या, दही-भात, शेंगदाण्याची चटणी, कांदा असं दुरड्या भरून, वाजत-गाजत बहिणीनं तोरण घेऊन यायचं. भावाच्या घराचा उंबरा धुऊन ते चौकटीला बांधायचं. मग आप्तेष्टांनी यथेच्छ ताव मारायचा.
लग्न ही तर आठ-दहा दिवसांची बेजमी म्हणायला हरकत नाही. हळद जात्यावर दळायला आजूबाजूच्या बायका-मुलींना जमवायला सुरुवात झाल्यापासून मुहूर्तमेढ, लग्नाचा चुडा, गुगुळ, हळदी, साखरपुडा, अक्षता, लग्न, वरात, गोंधळ, जागर ते हळद काढण्यापर्यंतचे सगळी विधी पार पाडायचं म्हटलं तरी दहा-पंधरा दिवस वातावरण उत्साहानं भारलेलं राहतं. उखाण्यांपासून वरातीतल्या पेंगे (झोपेची डुलकी)पर्यंत धम्माल मजा असते. लग्न ठरलं की याद्या करण्यासाठी ज्येष्ठ मंडळी चर्चेला बसतात. देण्या-घेण्याचे मुद्दे सुरू झाले की मुख्य मुद्दा असतो नवरा-नवरीचे पोषाख. "मुलाचे कपडे कोण काढणार?' "मुलाचे कपडे मुलीकडच्यांनी काढावेत' आणि "मुलीचे कपडे मुलाकडच्यांनी काढावेत' हे सहजच बोललं जातं. पुढे बाजारपेठेत कपडे खरेदीला ही दोन्ही घरची मंडळी एकत्र येतात. परस्परांच्या आवडीने खरेदी होते. दुकानाबाहेर आमच्यासारखा ओळखीचा भेटला, की विचारपूस होते. ""काय, हिकडं कुठं?''
""आमच्या भाच्याचं लग्न ठरलंय, म्हणून कपडे काढायला आलोय.'' "कपडे काढणं' म्हणजे "खरेदी करणं' हा खास इथला अर्थ ज्यांना माहीत नाही त्यांना त्यापुढची चर्चा अधिक खुमासदार वाटेल.
""मग कुठे काढले कपडे?''
""मुलीचे चंद्ररूप वालावलकरमध्ये आणि मुलाचे रेमंडमध्ये.''
""मग?''
""मग काय! आम्ही दोघांचे कपडे काढून सोळंकीत आइस्क्रीम खायला आलोय.''
आपण काय बोलतो, त्याचा अर्थ काय होतो याच्या परिणामांची पर्वा या अघळपघळ लोकांमध्ये नाही.
"चौकश्या' करणं हा इथल्या रिकामटेकड्यांचा खास उद्योग. खरं तर याला "दुसऱ्याची मापं काढणं' असा वाक्‌प्रचार अस्तित्वात आहे. अशा वाक्‌प्रचाराप्रमाणेच अनेक विशेषणं, क्रियापदं, अनेकवचनं यांच्याही खास शैली इथे रुजल्या आहेत. "पॅन्टी शिवायला टाकल्यात, त्या आणायला निघालोय' असं वाक्य इथे सहज कानावर पडतं. "पॅन्ट'चं अनेकवचन आमच्याकडे "पॅन्ट्‌स' असं न होता "पॅन्टी' होतं. भाषेच्या अशा अनेक करामती इथं होतच असतात. "निघालो आहे' असं म्हणण्याऐवजी जरा जोर देऊन "निघालोय' असा शॉर्टकट आम्ही सर्व क्रियांसाठी वापरतो. उदा. खायलोय, करायलोय, जायलोय, बघायलोय, टाकायलोय, यायलोय वगैरे.
तसं पाहता कोल्हापुरी भाषेला एक वेगळाच बाज आहे. इथे शिवीचा आवर्जून वापर होतोच; पण कोल्हापुरी अस्सलपणा किंवा झणझणीतपणाबरोबर "शिव्यां'च्याही अनेक छटा इथे दिसतात. "ये रांडंच्या' हे रागाच्या भरात जेवढं जोर घेऊन येतं, तेच "काय रांड्या, कुठं गेलतंस?' ही अगदी जिवाभावाच्या मित्राच्या चौकशीची सुरुवात असू शकते. "ते रांडंचं...' असं दोघांनी चर्चा करताना तिसऱ्याबद्दल बोललेलं असतं; पण त्यात पुढे कौतुक, चेष्टा, टवाळी, सहानुभूती, प्रेम, आदर यापैकी काहीही असू शकतं. म्हणजे "ते रांडंचं लई भारी पडलं बघ!', "ते रांडंचं लई शिकलंय रे!', "ते रांडंचं असंच राहिलं बघ!' वगैरे. पण काही म्हणा, जिवाभावाच्या मित्रानं आपल्याला तशी हाक नाही मारली तर चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. शब्दाचा अर्थ शिवीजन्य असला तरी तो इथं आप्तजनांसाठीच आहे. शिक्षक, मित्राचे वडील, समाजातील प्रतिष्ठित यापैकी कोणालाही हे बिरूद लावून बोलण्यास इथे मुभा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण याशिवाय इतर शिव्यांनी उद्धार सुरू झाला तर मात्र कोल्हापूरकरांचा इगो दुखावला जाऊ शकतो. मग मात्र "पायताण' अथवा "तलवार' असे दोन आणि फक्त दोनच पर्याय कोल्हापूरकरांना माहीत आहेत. आणि हो; इथे शिवीमध्ये प्राण्यांचा वापर होऊ शकतो. प्राधान्यक्रमावर घोडा, गाढव इत्यादी!
इथल्या इतर काही भाषिक वैशिष्ट्यांची ओळख नोंदवणंही आवश्यक आहे. उदाहरणार्थ, अनेक भाववाचक नामांचं आम्ही अनेकवचन करू शकतो. म्हणजे प्रेमं, भुका, चैन्या! बोलताना "हं, तुमी करा प्रेमं आणि आमी बघत बसतो!'; "काय, चैन्या करायलंस!'; "चला, आमानी भुका लागल्यात!' असं म्हटलं जाऊ शकतं. तसंच "केस'चं "केसं', "दगड'चं "दगडं', "पॅन्ट'चं "पॅन्टी' वगैरेही इथे सर्रास होऊन जातं.
आणखी एक खासियत म्हणजे "तो', "ती', "ते' हे अनुक्रमे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, आणि नपुसकलिंगासाठी वापरायचं, असं व्याकरणशास्त्र म्हणतं. पण इकडचं व्याकरण जगावेगळं आहे. "तो गेला' असं म्हणण्याऐवजी "ते गेलं की' असं म्हणून व्याकरणाची आम्ही खांडोळी करू शकतो. इथल्या स्त्रिया बोलताना "मी आले' असं म्हणण्याऐवजी "मी आलो', "मी गेलो' वगैरे म्हणतात. असं का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर लक्षात येतं, की हे मराठा राजधानीचं गाव आहे. "आम्ही आलो', "आम्ही गेलो-चाललो' वगैरे विधानं ही राजघराण्यातील व्यक्तींच्या बोलण्यातून आलेली आणि इथल्या माणसांच्या बोलण्यात, भाषेत, संवादात रुजली आहेत.
इथल्या चौकातल्या मंडळाजवळ किंवा तालमीच्या दारात बसून सुरू असणारी वर्णनंसुद्धा एकदम झकास! इथली "नाद कराय नाही', "नादखुळा रे...' अशी खास कोल्हापुरी रचना महाराष्ट्रभर नेली ती अवधूत गुप्ते यांनी. कोणी दुसऱ्याला एखादी गोष्ट अतिरंजित करून सांगत असेल किंवा मैत्रिणीला कडेला घेऊन सांगत असेल, तर जाता जाता "फशीव', "गंडीव' असा आवाज टाकून गेलं की भलतीच अडचण होऊ शकते. ही गोष्ट फक्त इथेच घडते. फुटबॉल आणि हॉकी हे आमचे "गावखेळ' आहेत. इथे मैदानात शिट्‌ट्यांबरोबरच शेलकी वाक्यं ही चिअरअपसाठी असतात आणि नंतर इतरांना त्यांच्या हायलाइट्‌स चौकात उभारून सांगताना "नादखुळा रे', "एकदम गड्डा जाम', "खटक्यावर ब्यॉट जाग्यावर पलटी' हे मॅच, कुस्ती, अपघात, प्रेमप्रकरणं यापैकी कशासाठीही सोईने वापरायचं "विशेषण वाक्य' असतं.
हां, आणखी एक आठवलं. इथल्या तरुण मंडळांची नावंसुद्धा भन्नाट आहेत. झाड ग्रुप, कलकल तरुण मंडळ, अचानक मित्र मंडळ, लेटेस्ट तरुण मंडळ, पॉवरफुल्ल चिक्कू मित्रमंडळ...! यावर रिसर्च करणं आवश्यक आहे. रिक्षाच्या मागील बाजूस किंवा मडफ्लॅपवर लिहिलेला मजकूरसुद्धा असाच अभ्यास करण्यासारखा. "बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलाय वाघानं', "तशी मी गावायची नाय,' वगैरे... हे सुचतं कसं, यापेक्षा ही या गावाची ओळख बनत गेली आहे, हे महत्त्वाचं! चेष्टामस्करीलासुद्धा एक खुलेपणा असावा लागतो. तो इथं आहे. इथं अनेक "टर्मा'ही (टर्म) तयार झाल्या आहेत. उदा. रंगाखुष, पाला झाला, हारकुन टुम्म! चेष्टा कुठं करावी यालाही इथं मर्यादा नाहीत. एखाद्या अंत्ययात्रेत प्रेताला खांदा दिलेला समोरून येणाऱ्याला इथे सहज विचारून जातो, ""काय, बसणार काय डब्बलशीट?'' खऱ्या अर्थानं हे सारं आघळपघळ.
पुण्यामध्ये पत्ता शोधायचा, विचारायचा तर "जोशी कुठं राहतात हे इथं विचारू नये' अशी पाटी वाचायला मिळते. कोल्हापुरात मात्र बरोबर याच्या उलट दृश्य पाहायला आणि अनुभवायला मिळतं. चौकात किंवा कोपऱ्यावर उभ्या असलेल्या मंडळींना पत्ता विचारला तर ते त्या व्यक्तीची इतर माहिती विचारतील आणि एकमेकांत सांगतील...""अरे, त्या बॉबकटचा बाबा रे! काळं गिड्डं रे ते!'' हे पत्ता विचारणाऱ्याच्यासमोर होऊ शकतं. त्यापुढे पत्ता सांगून रिकामे. ""हे बघा, सरळ-स्ट्रेट जावा. पुढं एक गोल-सर्कल लागंल, तितनं लेफ्ट मारा (चालतानासुद्धा!). त्या बोळात एक पायपीचा (ट्यूबलाइटचा) डांब (खांब) लागंल. त्याच्या जरा पुढं गेला की पाण्याची चावी (नळ) दिसंल. तिथं बायका हायेतच; त्या त्यांच्याच!'' एवढं ऐकून गोंधळलेला पाहुणा आणखी गोंधळू नये म्हणून एखाद्या लहान मुलाला ""ए बारक्या, जा ह्यास्नी सोडून ये,'' असं सांगणार. हे सगळं "आपल्या गल्लीत' आलेल्या पाहुण्यांसाठी, हे लक्षात घ्यायचं. ते पाहुणे परत जाताना पुन्हा दिसलेच, तर "पावनं, गावलं नव्हं घर?'' असं आवर्जून विचारणार आणि रिक्षाला हाक मारून पाहुण्यांना त्यात बसवून निरोप देणार. "पायीप' म्हणजे ट्यूबलाइट, डांब म्हणजे खांब, चावी म्हणजे नळ...असे बरेच शब्द हे खास कोल्हापुरी शब्दकोशातले, हे समजलं असेलच. त्याचबरोबर अनेक समानार्थी शब्द, वाक्‌प्रचार, विशेषणं वगैरेंचा स्वतंत्र कोश आहे; पण तो केवळ मौखिक असल्याने समजून घ्यावा लागतो वा अभ्यासण्यासाठी इथंच जन्म घेऊन लहानाचं मोठं व्हावं लागतं.
शिवाय इथे ऍडिशनल बोनस म्हणून "दाद' कशी द्यावी याचं खास प्रशिक्षणाचं पॅकेजही आहे. इथे कुस्तीला, तमाशातल्या नाचाला, ढोलकीच्या तालाला, शास्त्रीय संगीताला, रश्शाला, मटणाला, सिनेमाला, खेळाला, जनावराला "दाद' देण्याचे वैविध्यपूर्ण असे प्रकार आहेत. शिट्टी कधीही वाजवायची नसते. विशिष्ट दाद, अदा, अर्थ, झटका ही लावणीत वापरण्याची शिट्टीची ठिकाणं. पण ढोलकीवर थाप पडल्यापासून अनेक ठिकाणं खास असतात. ढोलकीचा आवाज बारीक होत जातो तेव्हा आपला आवाज बंद ठेवून "बारीक' म्हणून आवाज येऊ शकतो, तीही "दाद'! सही मागायला नाही, पण "हेऽ झकास! पुन्यानदा व्हायला पाहिजे!' असं त्या कलाकाराला खासगीत भेटून इथली माणसं नंतर सांगतीलच, पण घरी येण्याचंही आमंत्रण देतील.
इथे मैदानातलं चिअरअप आणखीनच जोशपूर्ण! खास प्रतिस्पर्धी संघावर भीतिदायक किंवा आक्रमक छाप टाकायची असेल तर पहिल्याच टप्प्यात प्रभावी कृती केली जाते, त्यासाठी इथे हमखास "हाबकी डाव' असा शब्दप्रयोग केला जातो. "सिनेमाला दाद' याबाबत अमान मोमीन या कोल्हापूरच्या पण वास्तव्याला अमेरिकेत असणाऱ्या एका रेडिओ प्रोग्रॅमरने सांगितलेला किस्सा छान आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, थिएटरच्या चौकात जाऊन गर्दी जास्त कुठून बाहेर येते ते पाहावं. गर्दीतल्या एखाद्याला विचारलं तर तो जे सांगेल त्यावरून सिनेमाचं तिकीट काढायचं. त्यातही कोल्हापुरी प्रेक्षक असेल तर "शिनेमा एकदम खल्लास', "दिलप्यानं तोडलंय रेऽ', "आणि "वैजी जाळ हाय' असं दिलीपकुमार आणि वैजयंतीमालाच्या सिनेमाचं वर्णन ऐकायला मिळू शकतं. याला "दाद' म्हणावं!
"निवांत!' या शब्दाची व्युत्पत्ती शोधायला गेलं तर त्याचं मूळ नक्की कोल्हापुरातच असेल. खूप कष्टाची तयारी असली तरी इथलं जगणं प्रत्यक्षात निवांत आहे. पण हे पेन्शनरांचं गाव नाही. मग निवांत म्हणजे नेमकं काय? तुम्ही कोणालाही विचारा, "काय चाललंय?' किंवा "काय विशेष?' तर उत्तर एकचः "निवांत!' कारण गावाची लांबी-रुंदी पाच बाय सात किलोमीटर. म्हणजे कामाच्या ठिकाणी जायला किंवा यायला जास्तीत जास्त अर्धा तास. त्यामुळे त्याआधी आणि त्यानंतर निवांतच वेळ असतो. मग चौकात गप्पा नाहीतर चकाट्या. त्यामुळे "निवांतपणा' हा रक्तातच भिनलेला. शेती असणारेसुद्धा ऊसवाले. उसाचं पीक हे जरा इतर पिकांपेक्षा वेगळं. एकदा त्याची लागवड केली की तीनदा पीक फक्त कापून फॅक्टरीला पाठवायचं, नाहीतर गुऱ्हाळाला. त्याला पाणी पाजणं हे काम. मोटर सुरू केली की पाटाने सरीतून ते आपोआप जातं. सगळ्या शेताला पाणी पोहोचलं का, हे पाहायला इथला शेतकरी वेगळी ट्रिक वापरतो. मातीचं एक ढेकूळ किंवा दगड उचलून अपेक्षित दिशेने फेकतो. जर "डुबुक' असा आवाज आला तर पाणी पोचलंय. मग मोटरचा खटका (स्विच) बंद. झालं, वर्षातनं दोन-चार वेळेला कारखान्याचं बिल किंवा गुळाची पट्टी मिळाली की काम खल्लास. अर्थातच इथलं सगळं कसं "निवांत'! म्हणूनच मोटरसायकल घेऊन गावात फिरायला रिकामी झालेली इथली मंडळी शौक जपतात आणि सामान्य माणसंसुद्धा किरकोळ काम करून माशाचा गळ घेऊन निवांत टाइमपास करताना दिसतात.
माशाच्या गळावरून आणखी एक मुद्दा सांगितलाच पाहिजे, तो म्हणजे इथल्या तळ्यांचा. हे तळ्यांचं किंवा कमळांचं गाव. "कोल्लंं' म्हणजे कमळ. म्हणून कोल्लापूर, अशी एक व्युत्पत्ती गॅझेटियरमध्ये नमूद आहे. संपूर्ण तटबंदी, त्याभोवती खंदक आणि सात प्रवेशद्वारं असलेल्या या गावात 24 तळी असल्याचे उल्लेख आढळतात. नियोजनाच्या अभावामुळे आणि परिणामांचा विचार न केल्याने इथली सगळी तळी खरमाती, कचरा, निर्माल्य-मूर्त्यांनी बुजली; पण तळ्यांशी नाती मात्र सतत टवटवीत आहेत. "रंकाळा' हे त्याचं साक्षात उदाहरण. तरुणाई याच रंकाळ्याच्या काठावर फुलते. नजरानजर, आणाभाका आणि लग्नानंतर कोणी आपल्याकडे बघत नाही ना, हे लक्षात घेऊन लग्नाच्या बायकोच्या हातात हात घेऊन चालायचा प्रयत्न करणाऱ्या जोड्या, रिटायर मंडळी, आंबटशौकीन, व्यायाम करायला येणारी मंडळी या सगळ्यांशीच रंकाळ्यानं नातं जोडलं. अगदी आबालाल रहमान, बाबूराव पेंटर, माधवराव बागल अशा अनेकांच्या कुंचल्यांनी इथं पेंटिंग चितारली. अनेक कॅमेऱ्यांनी इथला सूर्यास्त टिपला. व्ही. शांताराम, दादा कोंडके, भालजी पेंढारकर यांनी सिनेमा चित्रीकरणासाठी रंकाळ्याची निवड केली. पर्यावरणीय मुद्यांसाठी झालेल्या अनेक आंदोलनांत सहभागी होऊन हजारो लोकांनी रंकाळ्याबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलं. आजही हा रंकाळा कोल्हापूरच्या गळ्यातला ताईत आहे.
भेळ ही कोल्हापुराची आणखी एक खासियत. नेहमीपेक्षा ही भेळ जरा वेगळी. राजाभाऊ हे भेळप्रकरणातलं अग्रणी व्यक्तिमत्त्व. इथले चिरमुरे हे पाणचट आणि पोकळ नसतात. थोडीशी खारट चव असणाऱ्या भरीव चिरमुऱ्यांची इथे झक्कास भडंग केली जाते आणि मग त्यात फरसाण, चिंचेचा कोळ, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, त्यावर कैरीची तिखट-मीठ लावलेली फोड कागदाच्या वाडग्यात घेऊन कागदी चमच्याने खायची. या भेळीचा आंबटगोडपणा जगण्यात नाही मुरला तरच नवल!
खाण्यापिण्याला दाद ही तर इथल्या चटपटीतपणाची करामत आहे. कोल्हापुरी मिसळीचा नाष्टा हा घाम फोडणारा असतो. एकदा ही मिसळ खाऊन पहा. मग दही-मिसळ, मटणाच्या शिळ्या रश्शाची मिसळ, भज्यांचा चुरा घालून मिसळ, दूधमिसळ असे पुढचे टप्पे खायला कोल्हापूर बुकिंग सुरू होईल. इथली मंडळी मटणाला "हावरी' आहेत असं म्हणतात. पण खरं तर तसं नाही. ती मटणावर प्रेम करतात, त्याबरोबर जगतात, असं म्हटलं तर चूक नाही. जन्मानंतर जी पाचवीची पूजा केली जाते तिथेच नैवेद्य म्हणून बकऱ्याची मुंडी आणि पाय दाखवले जातात. कदाचित त्याचा हा परिणाम असेल. इथे दिवाळीपासून पाडव्यापर्यंत खेडोपाडी "माही जत्रा' असते. मोटरसायकलवरून तब्बल 50-100 किलोमीटर "तिब्बलशीट' प्रवास करून माहीचं जेवण जेवायला जाणारे "मटणप्रेमी' इथेच भेटतात. हे जेवण थोड्याफार मद्यसेवनाने सुरू होतं. ढिगभर भातावर हवा तेवढा रस्सा यावेळी मिळू शकतो. मटणाचा खडा (फोड) चुकून एखादा आला तर आला, पण "रश्शासाठी जगावं' हा मूलमंत्र जपण्यासाठीच जेवायचं आणि या जेवणाला आमंत्रण असावंच लागतं असंही नाही. अनोळखी घरात मित्रांबरोबर आपण जाऊ शकतो. आपल्याला अगत्यपूर्वक जेवण मिळेल याची खात्री आहे आणि माणसं वाढली, असं यजमानांना वाटलं तर रश्शामध्ये पाण्याची घागर ओतून चटणी-मीठ टाकलं की बस्स! या रश्शाला इथे "खुळा रस्सा' असं म्हटलं जातं. हॉटेल किंवा थोड्या बड्या घरात जेवणाचा योग आला तर पांढरा रस्सा, पुलाव, गोळी पुलाव, दम बिर्याणी, खिमा असे खास पदार्थ मिळतील. शाही जेवणात 12 प्रकारचे रस्से असत. शिवाय कुंभार समाजात केली जाणारी रक्ती, घिसाडी समाजाकडून भाजून आणलेल्या मुंडीचा रस्सा, गावठी कोंबडीचा रस्सा, अगदी गरीबाघरी अगत्यानं केली जाणारी भाकरी व अंड्याची पोळी (ऑमलेट), खर्डा, झुणका, दही हे आमचं मेनूकार्ड कोणाशी स्पर्धा करणारं नाही पण मिरवणारं मात्र आहे.
इथल्या दुधाला येणारी सायसुद्धा इथल्या दाटपणाची ओळख देणारी आहे. दुधापासून बनलेली बासुंदी आणि कंदी पेढे हे नृसिंहवाडीसारख्या परिसराचे खास पदार्थ आहेत. इथे कवठाची बर्फी हासुद्धा स्पेशल पदार्थ. आणखी एक- कोल्हापूरकडच्या परिसरात चहा जरा जास्त गोड असला तरी दुधाचा असतो. कोल्हापूर शहरातल्या जुन्या चौकांमध्ये आजही म्हशीचं धारोष्ण दूध तिथल्या तिथे पिळून फेसासह दिलं जातं. सोडा-लिंबाला जसा फेस येतो तसा या ग्लासमधल्या दुधावर येतो. मिश्यांना किंवा ओठांना लागलेला फेस शर्टाच्या हातोप्यानं पुसला की गावभर फिरायला ओके! इथं "सोळंकी आइस्क्रीम' हे प्रस्थ तब्बल तीन-चार पिढ्या घरा-घरांशी नातं जोडून आहे. बाहेरून आलेली कोणतीही कंपनी- कोणतंही आइस्क्रीम इथं पाय रोवू शकलं नाही. त्याशिवाय थंडाई इथं तालमीत पैलवान तयार करतात किंवा आइस्क्रीमच्या दुकानात. "दुकानात' हा शब्द मुद्दाम नोंदवला. कारण बारा महिने फक्त आइस्क्रीम विकणारी प्रशस्त अशी पन्नास तरी दुकानं या गावात आहेत. त्या दुकानांमध्ये ब्रॅंडेड शीतपेयं आजही मिळत नाहीत. इथं अजूनही "सोडा फाउंटन' आहेत. नुकतंच सचिन पिळगावकरांनी पुरवलेल्या माहितीप्रमाणे जगात असं फाउंटन असणारी दोनच शहरं आहेत, त्यापैकी कोल्हापूर एक आहे. आजही इथे बाटलीतला गोटी सोडा आहे.
दुधातला आणखी एक खास पदार्थ म्हणजे "खरवस'. खरवसाच्या वड्या आणि बर्फी हे अफलातून आणि दुर्मिळ पदार्थ. कॅरामल पुडिंग ही जरी पार्टीची स्वीटडिश असली, तरी खरवस ही इथली म्हशीला झालेल्या पिल्लाच्या जन्मानिमित्त तयार झालेली सेलिब्रेशन डिश आहे. तशी आणखी एक स्पेशल गोष्ट म्हणजे "काकवी'. हा आमचा देशी "शुगरकेन जॅम'! शिवाय उसाचा रस, भेळ, चिरमुऱ्याचे लाडू, चिरमुरे हे फक्त टाइमपास आयटम.
एव्हाना इथल्या नॉनव्हेजला जगमान्यता मिळाली आहे. अगदी जगभरातल्या पंचतारांकित हॉटेलांच्या मेनूकार्डवर कोल्हापुरी रेसिपीजना "मटण कोल्हापुरी' अशी ठसठशीत जागा मिळाली आहे. पण ही जागा का मिळाली; या प्रश्नाचं उत्तर कोल्हापुरी चटणीशी जोडलेलं आहे. ही चटणी तयार करणं म्हणजे एक दिव्य असतं. विशिष्ट प्रमाणात सुमारे पंचवीस ते अठ्ठावीस मसाल्याचे पदार्थ क्रमाने एकत्र होत जाऊन त्यासोबत कांदा, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीपूड एकजीव होते. त्याचा रांगडा वास असतो. त्याला "कोल्हापुरी चटणी' म्हणून ओळखलं जातं. रस्सा-मटणाचं ती ईप्सित आहेच; पण नवी चटणी बनते त्या दिवशी गरम भाकरी, तेल आणि चटणी खायला नशीब लागतं आणि त्यासाठी कोल्हापुरात जन्म घ्यावा लागतो!
बटाटेवडा हे सामान्यांचं मधल्या वेळेचं मिष्टान्न! पुण्यातला जोशीवडा आणि बॉम्बेवडा यांना कोल्हापूरचा वडा पुरून उरतो. कारण घसघशीत आकार नि डाळीच्या पिठाचं जाडजूड आवरण! तो खमंग आणि खुसखुशीत तळलेला असतो. वडा-पाव किंवा कटवडा खाऊनच बघा! आणि मिलनची कांदाभजी, माळकरांची जिलबी, खासबाग किंवा बावड्याची मिसळ, चोरग्यांच्या मिसळीचा कट, एल.आय.सी. कॅंटीनची खांतोळी व इंपीरियलची थंडाई तर भन्नाटच!
एकूणच, कोल्हापुरी पदार्थ हा अनेकांचा वीक पॉइंट आहे.
पुणेरी बाकरवडी आणि कोल्हापुरी बाकरवडी अशी स्पर्धा असली, तरी बनवणाऱ्या माणसांची ठेवणच वेगवेगळी आहे. आजही कोल्हापुरात बारसं ते मृत्यू अशा प्रवासात अनेक जेवणावळी होतात; पण कोणी मयत झालं तर दहा दिवस आजही त्या घरात चूल पेटत नाही. इथली माणुसकीची ठेवण औरच आहे. शेजारधर्म म्हणजे काय, याचा हा वस्तुपाठ. गल्लीत कोणी मयत झालं तर प्रत्येकाच्या घराची कडी वाजवून निरोप दिला जातो. शहरीकरणाच्या बदलांबरोबर ही रीत मात्र बदलेली नाही. अंत्यविधीसाठी लागणारं साहित्य आणायला पैसे कोणीतरी परस्पर खर्च करतं, पण त्या कुटुंबीयांकडून ते नंतर संबंधिताला दिले जातात. दहा दिवस शेजारी व नातेवाईक त्या घरातील सर्वांचं जेवण, चहा, नाष्टा आपणहून आणून देतात. कोल्हापूर शहरात तर अंत्यसंस्काराला आवश्यक लाकूड-शेणी महापालिका मोफत पुरवते. तसं इतर साहित्य ज्या ठिकाणी मिळतं ती मोजकी ठिकाणं आहेत. तिथला संवाद हा विशेष आहे. रात्री-बेरात्री त्या घराचं दार वाजवलं की वरची खिडकी उघडून विचारणा होते, ""बाई की बापय?'' जर "बाई' असं उत्तर दिलं, तर ""विधवा की सवाशीण?'' असा पुढचा प्रश्न विचारला जातो आणि काही मिनिटांत सगळं साहित्य पावतीसह ठेवलं जातं. या गावातली आणखी एक ठळक नोंद केली पाहिजे. इथले फूलवाले मयताच्या हाराच्या दराची घासाघीस करत नाहीत. ठेवले जातील तेवढे पैसे घेतले जातात. रात्री फुलांची दुकानं बंद झाल्यानंतर मृतदेहाला हार लागणार, हे लक्षात घेऊन ते दुकानाबाहेर लटकावून ठेवले जातात. आपण हार घेऊन पैसे ठेवले किंवा नंतर दिले तरी चालतात, ही इथली संस्कृती आहे. शेजारधर्म सांभाळण्याइतकीच दुश्मनीही इथे असू शकते; पण एखादा दु:खद प्रसंग घडला, की तिथे दुश्मनीसुद्धा धावून जाते आणि एकोपा होतो.
"एकोप्या'वरनं आठवलं. देशभरात हिंदू-मुस्लिम द्वेषाची बीजं पेरली गेली असली तरी त्याला कोल्हापूर हा अपवाद आहे. इथे मशिदीच्या चौकटीवर "गणपती' दिसू शकतो. गणपतीचं दर्शन घेऊन बाबूजमाल दर्ग्याचं दर्शन घेणारे मुस्लिम-हिंदू तुम्हाला इथे नेहमीच दिसतात. पीराच्या उत्सवात पुढाकार हिंदूंचा; इतकंच नव्हे, तर पीर आणि गणपती एका मांडवात असणार, हेही दृश्य इथलंच! बकरी ईद मुस्लिमांशिवाय इतरांना जरा लवकर यावी असं वाटतं, कारण बिर्याणी आणि खीर चापून खाण्याची ती संधी असते. नकळत दोन-चार घरांतून आमंत्रण किंवा डबा येणार हे नक्की असतं. नृसिंहवाडीच्या संगमावर चालणारे अंत्यसंस्कारांनंतरचे विधी ब्राह्मणाकडून हिंदूंप्रमाणेच मुस्लिमांचेही होताना दिसतात. हे इथल्या संस्कृतीचे आदर्श पैलू आहेत.
इन्व्हेस्टमेंट! पैसे रियल इस्टेटमध्ये गुंतवणं किंवा बॅंकेत ठेवणं हा प्रकार इथल्या जुन्या वळणाच्या लोकांच्या अंगवळणी पडणं अवघड. हा सगळा खरं तर चोरीचा मामला असतो. म्हणजे वेगळं काही नाही; पण एकत्र कुटुंबात कुणाला कळू नये यासाठी करायचा हा खटाटोप. अनेकदा बॅंकेचं पत्र आलं तर घरात भांडणाचं निमित्त व्हायचं, म्हणून तिकडं जायचं नाही. बाजारहाटीतले बाजूला काढलेले पैसे वर्षात साडेतीन मुहूर्ताला हळूच काढून अगदी ग्रॅम-दोन ग्रॅम सोनं घेऊन ठेवायचं, ही बाईमाणसांची आयडिया आजही सुरू आहे. पुरुष मात्र पैसे ठेवतात ते भिशीमध्ये. भिशी हे प्रकरण खाण्या-पिण्याचं नाही, पण दिवाळीला बोनस नाही मिळाला तरी तोंड वाकडं होऊ नये म्हणून! उच्च मध्यमवर्गीयांनी मात्र रिटायरमेंटनंतर मिळालेले पैसे काही बॅंकांत व्याजदर जास्त म्हणून गुंतवले; पण अनेक पतसंस्था, बॅंका बुडाल्या आणि तेसुद्धा बुडाले. खरं तर आज विश्र्वासार्हता कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा जमिनी-सोन्याकडं गुंतवणुकीचा कल दिसतो. म्हणजे अडीअडचणीला तारण ठेवून पैसे उभे करता येतात, हा विश्र्वास त्यांना वाटतो.
आपल्या घराचं स्वप्न पाहताना मूळचे कोल्हापूरकर कधी फ्लॅट सिस्टिममध्ये रमत नाही. दोन-तीन दशकांपूर्वी शिक्षक, क्लार्क अशा मध्यमवर्गीयांनी हजार-पंधराशे स्क्वेअर फुटांचा प्लॉट घेऊन दोन-तीन खोल्यांची घरं बांधली. घरांना आई-वडील किंवा स्वत: पती-पत्नींचं नाव देण्याची क्रेझ. पण नाव मात्र ठसठशीत आणि कोरीव. ते बघूनच अभिरूची स्पष्ट होणार हे नक्की. "मातृ-पितृ-छाया' या कॉमन नावापासून अफलातून कॉंबिनेशन्स इथे दिसतील. "प्रगुंपा' असं एका घराचं नाव. अर्थ काय? प्रमिला गुुंडोपंत पारगावकर. नावातल्या पहिल्या अक्षरांपासून घराचं नाव तयार करण्याची ही किमया फक्त कोल्हापुरातच दिसते.
इथली ऐसपैस परिसर असलेली बैठी घरं अंगण-परसाला जोडून साधेपणा जपतात. अगदी अलीकडे इथली वाडासंस्कृती कमी झाली; पण अजूनही हाकेला "ओ' मिळते. पाहुणे आल्यावर कपभर दूध किंवा लिंबू मिळवण्यासाठी किंवा अंगती-पंगतीसाठी इथं शेजार आहे. आईचा स्वयंपाक व्हायचा असेल तर शेजारच्या मावशींकडून डब्यात भाजी घेण्यासाठी लाजण्याचा प्रश्नच येत नाही. आजही उन्हाळ्यातले पापड, सांडगे, शेवया करताना एकमेकींच्या सोयीनुसार "टाइम-टेबल' होतं. एकमेकींना मदत करणाऱ्या काकू-मावशींशी रक्ताच्या नात्यापलीकडची नाती आजही आहेत. बायका-मुलं सुटीत डबे घेऊन पन्हाळा, कात्यायनी, वाडीला जाताना दिसतात, तर पुरुष मंडळी त्यांच्या एंजॉयमेंटला "रस्सा मंडळ' करतात. म्हणजे काय? भाकरी-भात आपापल्या घरातून आणायचा, वर्गणी काढून फक्त मटण करायचं आणि निवांत बसून जेवायचं.
नदी-तलावावर मासे पकडण्यासाठी दिवसभर गळ घेऊन बसणारेसुद्धा इथे दिसतात; तेही स्वत:च्या करमणुकीसाठी. तालमीत व्यायाम, फुटबॉल किंवा हॉकीचा सराव, बुद्धिबळाचा पट, कॅरम मंडळ किंवा मर्दानी खेळाचा सराव ही इथली मनोरंजनाची साधनं. नाटक, गाण्याचा कार्यक्रम, भजनी मंडळ हीसुद्धा मनोरंजनाची माध्यमं आजही वापरात दिसतात. इथली ग्रामीण आणि शहरी अशी तफावत मात्र विशिष्ट बाज असणारी आहे. मुंबई-पुण्यात घोड्यांच्या शर्यतीचा रेसकोर्स हा श्रीमंती खेळाचा आकर्षणाचा विषय आहे. इथं पूर्वी रेसकोर्स होतं, हत्तीची साठमारी, चित्त्याकडून किंवा ससाण्याकडून शिकार हे चित्तथरारक खेळ होते. आजही इथे म्हशी-रेडकांच्या शर्यती, बकऱ्यांच्या टक्करी, कोंबड्यांच्या झुंजी, कबुतरांच्या शर्यती, चिख्खल गुट्टा, पतंगाच्या स्पर्धा या पुरुषांच्या मनोरंजनाचा भाग बनतात. आज संगणकाच्या युगातही स्त्रियांच्या उखाण्यांच्या स्पर्धा, फुगड्यांची स्पर्धा, पाककलेच्या-रांगोळीच्या स्पर्धा होतात. स्त्री-पुरुषांच्या भजनीमंडळाच्या स्पर्धाही रंगतात.
"म्हशी' हा इथे चर्चेचा विषय असतो. अत्यंत देखण्या, चकचकीत काळ्या म्हशीची लांबसडक शिंगं, शेपटीचे कातरलेले केस आणि कानाच्या नक्षीदार पाळ्या (मुद्दाम केलेल्या) या गोष्टी त्यांना सौंदर्यस्पर्धेत बक्षिसं मिळवून देणाऱ्या ठरतात. मुलींच्या सौंदर्यस्पर्धांना मात्र इथे उत्तेजन मिळालं नाही. सलवार-कमीज किंवा पंजाबीत वावरणाऱ्या मुली थोडीफार फॅशन करतील; पण त्यांना अजून जीन्स आणि शॉर्ट टी-शर्टकडे सरकता आलं नाही. अशा प्रयत्नांना घरांतून विरोध आहे. "ते आटलेल्या कापडाचं कपडं घालून फिरू नको' अशी धमकीवजा सूचना ही इथे मिळते. इथल्या उच्चवर्गीयांच्या मुला-मुलींचा वावर असणारी कॉलेजच ड्रेसकोडचं समर्थन करणारी आहेत. कोल्हापूरबाहेरून आलेली मंडळी थोडीफार अशा नव्या फॅशनचा वापर करताना दिसली, तरी सार्वजनिक ठिकाणी पारंपरिक वेशभूषेला मिळतंजुळतं वागण्याचा दबदबा असतो.
वेशभूषेचा उठावदारपणा लग्नसमारंभात सगळीकडेच दिसतो, पण कोल्हापुरात दसऱ्याच्या शाही समारंभात तो आवर्जून पाहण्यासारखा असतो. महाराष्ट्रात लवाजम्यासह सीमोल्लंघनाला जाण्याची परंपरा फक्त कोल्हापुरात आजही पाहता येते. जुन्या राजवाड्यापासून आणि अंबाबाईच्या मंदिरातून निघालेल्या पालख्या, तोफगाडा, रणवाद्यं, घोडे, उंट, संस्थानचं पायदळ, शाहीर व पैलवानांचा ताफा, छत्र-चामरं, ध्वज, तलवारी-भाले, जरीपटका, मानकरी बॅंड, पोलिस आणि मिलिटरीचा बॅंड अशी भव्य लवाजम्याची मिरवणूक सूर्यास्तापूर्वी दसरा चौकात पोचते. शहरातील मान्यवर, प्रतिष्ठितांसह नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरू होतो. आजही "छत्रपती' पोचल्यानंतर संस्थानाचं राष्ट्रगीत वाजतं, पूजाविधी होऊन बंदुकीच्या फैरी झडतात आणि लक्कडकोटातून आपट्याची पानं लुटण्यासाठी झुंबड उडते. त्यानंतर लोकांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी राजा सर्वांना भेटतो. ही परंपरा आजही सुरू आहे. या परंपरेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देवीची पालखी सीमोल्लंघनाहून परतताना दलितवस्तीतून जाते. तो दिवस दिवाळीपेक्षा मोठा साजरा होतो, कारण जातीतील विषमतेची दरी संपवण्याची ही कृती म्हणजे परिवर्तनाचा मानबिंदू आहे. छत्रपती शाहूंनी केलेले सोशल इंजिनिअरिंगचे प्रयोग हे आजही इथे घट्ट रुजून आहेत. शहाण्णव कुळी, खानदानी वगैरे बिरुदं लावणारी मंडळी असली, गावात बारा बलुते राहणाऱ्या स्वतंत्र गल्ल्या आणि स्वतंत्र विद्यार्थी वसतिगृहं असली, तरी इथली सामाजिक एकतेची वीण मात्र घट्ट आहे. सार्वजनिक उपक्रमांत सर्वजण एकदिलानं एकत्र येतात. दसऱ्याची ही प्रथा शंभर वर्षांनंतरही अस्तित्वात आहे. दसऱ्याच्या समारंभात दरबारी पोषाख, जोधपुरी, बाराबंदी, तुमान, सुरवार, इराफी विजार अशा पांढऱ्या, मोती रंगाच्या कपड्यावर पगडी किंवा कोल्हापुरी थाटाचा जरीफेटा किंवा लहरी फेटा, त्याचा तुरा आणि शेला ऐटीचं प्रदर्शनही घडतं.
या ऐटीत फेट्याइतकंच महत्त्व आहे ते पायताणांना. कोल्हापुरी चपलेमध्येसुद्धा काही खास प्रकार आहेत ते त्यांच्या बांधणीनुसार. कुरुंदवाडी, कापशी, दोनतळी, तीनतळी, विंचू (करकर वाजणारं) अशा वेगवेगळ्या चपला इथल्या ग्रामीण भागात तयार होतात. जनावरांचं कातडं कमवण्यापासून चप्पल तयार करण्यामध्ये इथले कारागीर वाकबगार आहेत. कारागिरीचा उल्लेख झाला म्हणून सांगितलंच पाहिजे, की इथे सोन्या-चांदीचे दागिने, मूर्तिकाम करणारे कारागीर आपली वैशिष्ट्यं जपणारे आहेत. पण उद्यमनगरमधले पॅटर्नमेकर आणि लहान लहान सुट्या भागांची निर्मिती करणारे कारागीर हे तर देेशातल्या मोठ्या उद्योगांचे खरे आधार आहेत. त्यांच्या कौशल्याला योग्य मोबदला मिळतो की नाही, यापेक्षा अनेक यंत्रांतील महत्त्वाच्या सुट्या भागांच्या निर्मितीचं साधं श्रेयसुद्धा त्यांच्याकडे जात नाही, हा खरा सल आहे. इथल्या गुऱ्हाळघरामधला गुळव्या हासुद्धा दुर्लक्षित राहिलेला. उसाच्या रसापासून गुळापर्यंतच्या सर्व टप्प्यांची देखरेख करायची आणि अचूक वेळेला इंधनाचा ताव कमी करून काहील केव्हा उतरवायची, याचा निर्णय घेणारा हा "टेक्नॉलॉजिस्ट'. साखर कारखान्यातील चीफ केमिस्ट आणि उद्योगाच्या मॅनेजरपेक्षा तसूभरही कमी नसणाऱ्या या कारागिराचा व्यवसाय हा अजून हाय-फाय व्यवस्थापन किंवा इंजिनियरिंग कॉलेजात शिकवत नाहीत. गुळव्या, पॅटर्नमेकर, चांदी-सोन्याची आटणी काढणारा, कातडं कमावणारा, कोल्हापूर-मिरजेत तंतुवाद्यं तयार करण्याबरोबरच त्यातून अचूक सूर-ताल निश्चित करणारा, फेटे बांधणारा, तुतारी वाजवणारा, असे अनेक उपेक्षित कारागीर इथे आहेत आणि हाच इथला मनुष्यबळ आणि कौशल्यांशी निगडित असणारा कणा आहे.
वाद्यांवरून आठवलं. तुतारी वाजवणं हे कोण्या सोम्या-गोम्याला जमणारं नाही. पण इथं ते जोशपूर्ण वातावरण आणि "खच्चून स्वागत' करणारं वाद्य आजही वापरात आहे. इथल्या ग्रामदेवतांशी निगडित असणाऱ्या यात्रांमध्ये नदीचं पाणी देवळाच्या पायऱ्यांवर ओतण्याची आणि नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. पण त्या मिरवणुकीत किंवा पीराच्या (पंजे) मिरवणुकीत "पूईई-ढबाक' हे स्पेशल वाद्य वापरलं जातं. ते तालविशिष्ट आहे. "डब-डबडब' असा सततचा ताल आणि अतिशय छोट्या वाद्यातून निघणारा सूर यात असतो. हे अजब वाद्य नाचाची नशा चढवतं. त्याच्याशी डॉल्बी किंवा पाश्चिमात्य संगीत स्पर्धा करू शकत नाही. "जोतिबाची सासनकाठी' नाचवणं आणि कडेपूरचे ताबूत हे इथलं वैशिष्ट्यही पाहण्यासारखं, अनुभवण्यासारखं आहे. त्यालाही वाद्याची साथ असते. एकूण काय, म्हशींच्या स्पर्धा ते सण, उत्सव, लग्नातला "गुगुळ', लग्नानंतरचा जागर, गोंधळ किंवा यल्लमाचा लिंब या सर्वच ठिकाणी वाद्यांचा मेळ हा इथल्या समाजजीवनाशी झाला आहे.
जसं लहानपणी मारलेल्या उड्यांमुळे इथल्या माणसाचं रंकाळ्यावर प्रेम जडलं आहे. तसंच त्याचं पंचगंगेवरही प्रेम आहे. पोहायला सगळे इथंच शिकतात. याच पाण्यावर इथली समृद्धी. पण त्याबाबत कृतज्ञ आहेत इथली माणसं. कार्तिक पौर्णिमेच्या पहाटे शेकडो दिवे नदीच्या घाटावरच्या सगळ्या पायऱ्या, देऊळ आणि दीपमाळेवर प्रज्वलित होतात. संथ पाण्यात त्याचं प्रतिबिंब मावळणाऱ्या चंद्रबिंबासह दिसतं तेव्हा स्वर्ग अवतरतो आणि एरवीही रात्री चिअर्सपासून रश्शावर ताव मारण्याचं हे मैदान असू शकतं.
नदीचा घाट आणि त्या परिसरातील मंदिरं असं सगळं जसं अद्वितीय आहे तशाच आणखी काही बाबी आहेत. कळंब तलावातून कमानीवरून आलेला सायफन पद्धतीचा पाण्याचा पाट आणि पाण्याचा खजिना, रंकाळ्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून सव्वाशे वर्षांपूर्वी बांधलेल्या धुण्याच्या चाव्या, अंबाबाई-विठोबाचं मंदिर, साठमारी, ही ठिकाणं पाहण्यासारखी. इथले पुतळेसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण. घोड्याच्या दोन पायांवर उभा राहिलेला ताराराणींचा पुतळा, तसंच इतर अनेक व्यक्तींचे पुतळे इथे आहेत. अगदी "रेड्यांची टक्कर' दाखवणारासुद्धा पुतळा इथे आहे आणि इतिहासाच्या खुणा सांगणारे अनेक स्तंभही! पुतळे बनवण्याची कौशल्यं जपणारे आणि जगणारे पेंटर, रवींद्र मेस्त्री, वडणगेकरांपासून अनेक दिग्गज इथल्या मातीला आकार देणारे. अल्लादिया खॉंसाहेब, गोविंदराव टेंबे, केसरबाई, केशवराव भोसले, मंगेशकर कुटुंबीय, सुरेश वाडकर ते अलीकडच्या पिढीतला अभिजित कोसंबी ही मंडळी शास्त्रीय, नाट्य, सुगम संगीतातली मंडळी; लोकगीताच्या परंपरेतील हैदरसाहेब, शाहीद पिराजीराव सरनाईकापासून शिवशाहीर राजू राऊतासारखी खड्या बोलाची शाहीर मंडळी; वि. स. खांडेकर, रणजित देसाई, सुमती क्षेत्रमाडे, बाबा कदम, राजन गवस असे साहित्यिक आणि जगदीश खेबुडकरांसारखा कविमनाचा माणूस इथंच घडला. एकूण काय, इथं काहीच कमी नाही. खाशाबा जाधवांसारख्या ऑलिम्पिक वीराची परंपरा आजही वीरधवल खाडे, तेजस्विनी सावंत यांच्यासारखी इथली तरुण मुलं टिकवू पाहताहेत.
इथली माणसं स्वत:कडे जरा ताठ मानेनंच बघतात. आपल्याला इंग्रजी येणार नाही आणि बाहेरगावी आपलं जमणार नाही, असा न्यूनगंड त्यांच्यात डोकावतो. दुसऱ्याकडून शहाणपण ते सहज स्वीकारू शकत नाहीत. खरं तर बौद्धिक कुवत असूनही इथल्या माणसावर "खेडवळ' असा शिक्का बसला आहे. इथल्या माणसाला पुण्या-मुंबईचं खास आकर्षण नाही. आणि हो; इथून कुणी नोकरीसाठी बाहेर गेलं तरी ते दोन दिवसांसाठी तरी कोल्हापुराकडे त्यांचे पाय वळतातच. येतानाच प्लॅन होतो. ठरलेले मित्र, ठरलेल्या जागा, ठराविक जेवण! हे वर्षभराचं बॅटरी चार्जिंग असतं. अशी गावाकडे खेचून आणण्याची ताकद इथल्या रश्शात असावी.
गूळ आणि चपलेमुळे कोल्हापूर महाराष्ट्राला-देशाला परिचयाचं झालं, पण कोल्हापूरची उर्वरित महाराष्ट्राशी नाळ मात्र जोडली गेल्याचं दिसत नाही. कोकणाची मुंबईशी जशी नाळ आहे तशी कोल्हापूरची थोडीफार कोकणाशी आहे; पण तसं ते स्वतंत्रच राहिलेलं दिसतं. इथल्या प्रगतीसाठी खमका नेता कोल्हापूरला नाही. राजर्षी शाहूंच्या विकासकामाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यानंतर ठळक असं इथं फारसं घडलं नाही. व्हिजन असणारा नेता नाही हे दुर्दैव. कोल्हापूरबाहेरून आलेली हजारो मंडळी मात्र इथं पाय रोवू शकली. ती एव्हाना कोल्हापूरचीच झालेली आहेत. स्थलांतर होऊन स्थायिक झालेले आता 25 ते 30 टक्क्यांपर्यंत पोचले आहेत. मात्र इथले फारसे बाहेर जाऊन तिकडचे झाले नाहीत, हे या मातीचं वैशिष्ट्य असावं.
निर्वासित म्हणून आलेले सिंधी, मारवाडी, गुजराथी, कानडी हे इथलेच झाले. लिमलेटच्या गोळ्या विकून जगणारे आता बाजारपेठेचा कणा ठरत आहेत. काल-परवापर्यंतच्या भेळीच्या गाड्यांशेजारी आज चायनीज, मेवाड कुल्फी, पाणीपुरी, कच्छी दाबेली, दावणगिरी डोसा, केरळी शहाळी यांच्या तांबड्या गाड्यांनी गर्दी केली आहे. इथली भेळ, मिसळ, उसाचा रस, आइस्क्रीम मात्र तिथंच राहिलं आहे. इथल्या तरुणांना नोकरी किंवा व्यवसाय करायचा आहे, पण आपलं गाव सोडून नाही. गावातच किंवा अगदी घराजवळ व्यवसाय किंवा नोकरी मिळावी, अशी मानसिकता त्यांना बाहेर जाऊच देत नाही. वडिलोपार्जित घराच्या वाटण्या करत करत ती लहान होताहेत. शिक्षणाच्या अभावामुळे रिक्षा, टेंपो, पानाची टपरी इतकीच त्यांची उडी मर्यादित राहते आहे.
खरं तर या गावाला साहित्यिक, गायक, कवी, कारागीर, तंत्रज्ञ अशी मोठी परंपरा आहे, पण ती म्हणावी तितकी फोफावली नाही. याची कारणंही गुलदस्त्यात आहेत. आजही इथल्या प्रतिभेची पुसटशी जाणीव होते. क्षणभंगुर आनंदात हे सारं संपून जातं. तरी आपुलकी जपणारी, माणुसकी जपणारी इथली अघळपघळ माणसं मात्र ताठ आहेत हे नक्की!
********************************************************************
लेखक
श्री उदय गायकवाड
कोल्हापूर.
हा लेख युनिक फीचर्सच्या ‘महानुभाव’ या मासिकाच्या मे २००९ च्या अंकात प्रसिध्द झाला असून मूळ लेखक श्री उदय गायकवाड व युनिक फीचर्सचे कार्यकारी संपादक श्री मनोहर सोनवणे यांच्या लेखी पूर्वपरवानगीने या ब्लॉगवर ‘अरुणोदय’ च्या वाचकांसाठी प्रसिध्द केला आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.
****************************************************************

Friday 4 June, 2010

छोट्या जाहिराती (विनामूल्य सेवा)

दैनंदीन जीवनामध्ये निरनिराळ्या कारणासाठी आपल्याला छोटया जाहिराती दयाव्या लागतात. ‘अरुणोदय’ मध्ये अशा जाहिराती मोफत प्रसारित केल्या जातील.अशाप्रकारे आपल्या जाहिराती ‘अरुणोदय’ च्या वाचकांपर्यंत पोहोचतील व आपल्याला योग्य प्रतिसाद मिळेल.
आपल्या जाहिराती arunoday2010@gmail.com या पत्यावर ई-मेल नी पाठवा.
आपल्या जाहिराती http://arunoday2010.blogspot.com/p/blog-page.html या वेबपेजवर पहायला मिळतील.
ही सेवा विनामूल्य आहे.

Thursday 20 May, 2010

फिष्ट


लेखक-हिंमत पाटील
दिवस तसे सुगीचे होते. ऊन मी म्हणत होतं, कडाक्याच्या उन्हामुळं अंगातून घामाच्या धारा वहात होत्या. रस्त्यावर एखादं चिटपाखरूही दिसत नव्हतं. उन्हाच्या झळा एकसारख्या मारत होत्या. शांत पाण्यात मुठभर खडे टाकल्यावर जशी अनंत वलयं दिसतात, तशी दुर-दुरच्या सा-या शिवारात उन्हाच्या झळांची वलयंच वलयं दिसत होती.
दुपारची वेळ होती. गाव शांत होतं.उकाड्यामुळं घराघरातून विजेचे पंखे एकसारखे घरघरत होते. ज्यांच्या घरात पंखे नव्हते आणि ज्यांच्या घरात पंखे असुनही जास्त गदगदत होतं, अशी माणसं घराबाहेर होती. आप-आपल्या ठिय्याप्रमाणं! कुणी चावडीत, कुणी देवळात तर कुणी पारावरच्या लिंबाच्या झाडाखाली. मध्येच चुकून एखादी गार वा-याची झुळूक आली की, तेवढंच बर वाटत होतं. सर्वांगावरून जणु मोरपिसारच फिरविल्याचा भास होत होता.
चावडीपाठीमागील बाजुसच मराठी मुलांची शाळा होती.पंधरा मिनीटांच्या सुट्टीमुळे त्या शांत वातावरणाला तडा गेला. मुलांचा दंगा आणि आरडाओरडा सगळ्या वातावरणात घुमू लागला. शाळेसमोरच अपु-या बांधकामाची पाण्याची टाकी होती. काही उनाड मुलं त्या पाण्याच्या टाकीवर चढून गप्पा मारत बसली. काहीजण केशवबापूच्या मोकळ्या नव्या इमारतीत खेळू लागली तर काहींनी शेजारच्या कुंभाराच्या दुकानात चणं-फुटाण्यासाठी गर्दी केली होती.
पाटलाच्या नंद्याचा वेगळाच ताफा होता. रस्त्याच्या पलीकडील, पाटोळ्याच्या विहीरीवरील, कळकांच्या बेटाच्या सावलीत त्याचा ग्रुप बसला होता. त्यातील निम्मी-अधिक मुलं हुडच होती. त्यांचा सोबती, ‘पत्त्याचा डाव’ सतत त्यांच्याबरोबर असायचा. तरीही, आज त्यांना पत्त्यात रस नव्हता. त्यांचा आज वेगळाच प्लॅन चालला होतं.
त्या सर्व मुलांचा म्होरक्या नंद्याच होता. तो जी, सांगेल ती पूर्व दिशा ठरत होती. अर्थात त्याच्या अंगी तसे गुण होते. भांडणात पटाईत, बुद्धीने हुशार, बोलणं लाघवी. तो बोलायला लागला तर मग ते खरं असो, खोटं असो वा थापा असोत. समोरच्या माणसाला तो आपलासा वाटे. अगदी चिरून पोटात घालावासा वाटे!
नंद्या म्हणजे तसा औरच मुलगा होता. नदीवर पोहायला गेला की, पाण्यात पडल्यागत दिवसभर तिकडेच. कधी कुणी काही काम सांगितलं की त्या कामाचा बाजाच. काम तर कधी करायचा नाहीच आणि त्यातूनही मनात जर आलं तर, रेड्यावर पाऊस पडल्यागत! काम सांगणा-याला वाटे, त्याला आणायला सांगितलेली वस्तु हा तयारच करुन घेऊन येतोय की काय?
नंद्याच्या बरोबरीची मुलं तालुक्याच्या गावी कॉलेजात शिकायला गेली होती. हा मात्र हाय तिथंच! शाळेत तर तो कधीच हजर नसायचा. त्याच्या घरातील लोकांना वाटे, आपला मुलगा शाळेत जातोय. पण हा तर हजेरीच्या तासापुरताच शाळेत असायचा आणि बाकीच्या तासांना दांड्या मारुन गावात उनाडक्या करीत फिरायचा!
अलीकडं तर त्याला फ़ारच वेगळेच वळण लागलं होतं. रस्त्याच्या वळणासारखं.
या वर्षा दोन वर्षात नंद्याला चोरीच करायची सवय लागली होती. रात्रीच्या वेळी कोणाची शेळी चोरायचा, कोणाची मेंढी पळवायचा आणि वडगावच्या बाजारात नेऊन विकायचा. आल्याल्या पैशातनं मित्रांच्या सोबतीनं मटणाची फिष्ट करायचा. कोंबड्या तर एक दिसा आड चोरायचा. कायमची चार-पाच पोरं जमा करुन, सौदा आणायचा आणि चोरुनच फिष्ट करायचा. हे आता त्याच्या अंगवळणी पडलं होतं.
गावातली आणि जास्त करुन शाळेच्या आसपासची लोकं या त्रासाला कंटाळून गेली होती. पण आपल्या कोंबड्या कोण चोरून नेत आहे हे समजायला त्यांना मार्गच नव्हता. ब-याच जणांची खुराडंच्या-खुराडं रिकामी झाली होती. त्यामुळे गावातील काहीजणांनी त्यावर पाळतच ठेवायला सुरुवात केली. काहीजण तर आपला काम धंदा सोडून त्या पाळतीवरच राहिली होती!
ही बातमी रोडक्याच्या मन्यानं, लगोलगच नंद्याला येऊन सांगितली.
आता फिष्टी कशा करायच्या? या प्रश्नाची उकल शोधण्यातच सर्वजण गर्क होते. मग वेगवेगळे प्लॅन निघत होते. पण पचनी पडेल असा एकही प्लॅन निघत नव्हता. जो तो आप-आपल्या विचारात मग्न होता.
आता इथुन पुढे त्यांना फिष्टी करता येणार नव्हत्या. त्यातूनही त्यांनी कोंबड्या चोरायचा प्रयत्न केला तर ते सर्वजण पकडले जाणार होते.
“नंद्या! आपून आसं केलं तर?” रमज्यानं विचारलं,
“कसं?” नंद्या कसनुसं तोंड करत म्हंटला.
“महीनाभर आपून गप्पच बसल्यालं बरं!”
“पर,तवर त्वांड तर गप्प बसायला नगो व्हय?”
कदमाच्या म्हाद्यानं मध्येच तोंड खुपसलं. त्यावर नंद्याच म्हणाला,
“नाय, रमज्या म्हणतुय त्येच खरं हाय! निदान, महीनाभर तरी कोंबड्या चोरायचं बंद केलं पायजे!”
“तवर फिष्ट-बिष्ट, सारं बंद?” मोहीत्याच्या उतम्यानं असा सवाल करताच रमज्या खवळला.
“अ ऽ ऽ य! तलपवान ऽ अ ऽ ऽ ऽ य!! हाडकावर नंबर टाकलेतीस का? न्हाय म्हंजे मार बसल्यावर, कुठलं हाड कुठं हुतं त्ये तरी समजल!”
त्यावर उतम्या गप्पच बसला. म्हाद्यानं आरसाटा घेतला. म्हंटला, “व्हय लेका उतम्या! रमज्या म्हणतुया त्येच खरं हाय. आता कोंबडी चोरायची मंजी, आदी पाठीला त्यालच लावलं पायजे!”
“आरं गपा रं! लय ऽ ऽ शानं हु नकासा! फिष्टी ह्या करायच्याच पण जरा येगळ्या पद्धतीनं.” नंद्या म्हंटला.
“येगळ्या पद्धतीनं? म्हंजी?” उतम्यानं विचारलं. इतक्या उशीर गप्प बसलेला वाण्याचा केरबा हासतच म्हणाला,
“पयल्या ठेक्याप्रमाणं! चोरायचं एखादं शेरडू नायतर मेंढरू आणि दाखवायचा त्याला वडगांवचा रस्ता.. हायच काय त्यात येवढ? अँ?”
“ह्ये समदं खरं हाय! पर लोकं समदी शानी झाल्यात, पयल्यावानी कुठं शेरडं बाह्यर बांधत्यात!” रमज्यानं आपली शंका बोलून दाखवली.
“न का बांधनात. आपल्याला कुठं गावातलं शिरडू चोरायचं हाय? आणि हे बघा! ह्या वक्ताला एखाद्च शिरडू चोरून उपेगाच न्हाय. तर दोन-तीन-चार एका दमात घाव्तील तेवढी शेरडं नायतर मेंढरं चोरायची.” आसं नंद्यानं म्हणताच सर्वांचा एकच हंशा पिकला. “आरं ऽ ऽ बि-या धनगराचीच मेंढरं आज चोरायची!” म्हंजे चार-पाच महिने तरी बिनघोर कसं?”
“डोकं पर डोकं हाय हं नंद्याच!” असं म्हणुन उतम्यानं मन्याला एक ढुसणी मारली.
“पर आज आपल्याला मेंढर, कुठं रं घावायची?” या म्हाद्याच्या प्रश्न केंद्रावर, केरबानं बातमी दिली.
“तात्या शिंद्याच्या खोडव्यात बसिवल्याती.”
“बरं आज सांच्यापारी अनिक मारुतीच्या देवळात जमुच की !” रमज्या म्हणाला.
“कशाला? एकदम राच्यालाच गैबिधोलपशी जमुन समदीजणं भायर पडू!” नंद्या म्हणाला.
“बरं बरं!” असं म्हणून सर्वांनी नंद्याच्या मताला दुजोरा दिला. इतक्यात शाळेची मधल्या सुट्टीची घंटा झाली. सर्वांनी ठिय्या मोडला.
पायाखालची जमीन तापली होती. फोफाट्याचे चटके बसत होते. सर्वांच्या डोक्यावर टोप्या होत्या. त्यामुळे निदान डोकी तरी शाबूत होती. सर्वजण गाडीवाटेच्या कडेला उगवलेल्या गवतातून चालत येऊन सोनाराच्या घराफुडील सावलीला उभी राहिली.
सकाळी दुसऱ्याच्या बांधाला कामाला गेलेली माणसं दुपारची सुट्टी करून माळाच्या वाटेने गावाकडे परतत होती. कोणाच्या डोक्यावर वैरणीचा बिंडा, कोणाच्या हातात जेवणाचे मोकळे डबे तर कोणाच्या खांद्यावर कुदळ, बेडगी असे साहित्य दिसत होते.
वर्गातून मुलं बाहेर पडू लागताच नंद्याचा लवाजमा शाळेत शिरला आणि आप-आपली दप्तरं घेऊन त्या मुलांच्यात मिसळला.
संध्याकाळचे नऊ वाजले होते. हवेत थोडासा गारवा जाणवत होता. दिवसभर जास्त उकडल्यामुळे रात्री पाऊस येईल ही अशा होती. परंतु आकाशात असंख्य पांढ-या शुभ्र चांदण्या लुकलुकत होत्या. सर्वत्र रुपेरी पांढरे शुभ्र चांदणे पसरले होते. जमिनीवरील चंदेरी सडा नावोनाव खुलत होता. पौर्णिमेच्या रात्रीमुळे ‘चंद्रमा’ही झकास उगविला होता. ही मोहक दुधाळ रजनी जणु सौंदर्याची सम्राज्ञीच बनली होती. त्यामुळे प्रत्येकजण आप-आपली जेवणे आटपून, गार वा-यात बसायला घराबाहेर पडत होता.
रोकड्याचा मन्या, वांकराचा रमज्या, मोहित्याचा उतम्या,वाण्याचा केरबा आणि भोसल्याचा म्हाद्या सर्वजण रोजच्याप्रमाणेच, नंद्याच्या खोलीवर अभ्यासाला जातोय असं सांगुन घराबाहेर पडले.
कोणी मारुतीच्या देवळापाशी असलेल्या वडाच्या झाडाखालून, कुणी बंधा-याच्या शेडाला वळसा मारुन, कुणी चांदपिराच्या पलीकडून तर कुणी गावाबाहेरील रस्त्याने येऊन गैबिघोलावर दाखल झालं. तिथं थोडी चर्चा करुन सर्वजण मळीच्या वाटेला लागली.
गाडी वाटेने सर्वजण झपझप चालली होती. गाड्यांच्या चाकोरीत पाय पडल्याबरोबर फुफाट्याच्या चिपळ्या उडून बाजूला पडत होत्या. फुफाटा, पायांना थंडगार लागत होता. चालण्याला अधिक गती देऊन सर्वजण तात्या शिंद्याची मळी जवळ करत होते. भाऊ कांबळ्यांच्या रानातली करंजाडं ओलांडून सर्वजण पांदीनं वरच्या डगरीला लागली.
सगळ्यांच्या पुढं कदमाचा म्हाद्या होता. चालता चालता म्हाद्या एकदम थांबला. तसं नंद्यानं विचारलं,
“का रं? का थांबलास?”
“कोणतरी माणसं गावाकडं निघाल्यात!” असं म्हाद्या म्हणताच नंद्यानं, जरा पुढं जाऊन बघितलं तर खरंच समोरून कुणीतरी दोघजण गावाकडेच येत असलेली दिसली. तसा नंद्या म्हणाला,
“आरं केरबा, रमज्या, मन्या, उतम्या! अरं ऽ ऽ मागं फिरा! पांदीत दडून बसूया. न्हायतर ही माणसं आपल्यास्नी वळाकतीली आन् मग सगळाच बट्ट्याभोळ हुईल.
“होय होय! मागं फिरा रं!” म्हाद्यानं सूर ओढला.
सर्वजण डगरीनं पळतच खाली लवणात आली आणि पांदीत, शेंडाच्या आडाला मावळ्यांनी जसं खो-यात दबा धरून बसावं तशी, श्वास रोखून बसली.
ती दोन माणसं, तशीच डगरीनं खाली आली पांदी-पांदीनं गावाच्या वाटेला लागली. ती माणसं लांब गेल्याची नंद्यानं खात्री करुन घेतली आणि मग त्यानं सगळ्यांना बाहेर बोलावून घेतलं.
पुन्हा सर्वजण डगर चढायला लागले. डगर चढून वर जाताच लांबवर त्यांना कोणाच्यातरी शेतात जोंधळ्याची मळणी चालल्याली दिसू लागली. गाडी वाटेवरच मळणी मशीन आडवी लावलेली दिसत होती दोघेजण कणसाच्या पाट्या भरून बैलगाडीवरच्या मशीनवर उभ्या राहिलेल्या गड्याकडे देत होते. एकजण गावाकडेच्या बाजूला जोंधळ्याचे पोते लावून उभा होता. तर एकजण मशीनच्या पुढच्या बाजूला फावड्याने भूसकाट ओढत होता.
डोंगर कपारीत, उंचावरून पाणी खोलवर कोसळावे णी त्याचे तुषार आजू-बाजूला पसरावेत त्याप्रमाणे मशीनमधून भुसकाटाचा धुरळा उंच उडत जाऊन नंतर खाली पडत होता.
नंद्याला प्रश्न पडला. मळीच्या वाटेवरच मळणी चालली होती. मळणी मशीनपासुन जाणं धोक्याचं होतं!
वाण्याच्या केरबानं डोकं चालवलं. त्यानं नंद्याला, गाडीवाट सोडून पायवाटेन, चौगुल्याच्या पानमळ्याकडेने जायचं सुचवलं!
नंद्याला केरबाचं म्हणणं पटलं. सर्वजण गाडीवाट सोडून आडरानात शिरली. जाधवच्या रानातला शाळवाचा ताटवा ओलांडून सर्वजण तात्या शिंद्याच्या मळीत आली.
मेंढरं खोडव्यातच बसवली होती. त्यांच्या चौबाजूंनी कात्याच्या दोरींची दोन अडीच फुटाची जाळी लावली होती. एका बाजूला बि-या धनगर तर दुस-या बाजूला त्याचा पोरगं घोंगडं पांघरून गरख झोपलेला दिसत होता.
बि-या धनगराची दोन कुत्री होती. पण ती कुठच दिसत नव्हती. इथंच कुठतरी ती असणार! एखादे वेळेस ती कुत्री भुंकायला लागली तर बि-या धनगर जागा व्हायचा!! असा विचार करुन नंद्यान सर्वांना तिथंच थांबवलं. मन्या, म्हाद्या, रमज्या आणि उतम्याला येलगाराच्या मोग-यात दडून बसायला सांगितलं. आणि तो केरबाला दबक्या आवाजात हळूच म्हणाला,
“केरबा! म्या एकटाच फुढं जातो. त्वा हितच, नांगरटीत थाम. पद्द्शीर याक याक मेंढरू तुझ्याकडं काढून देतो. त्वा येलगाराच्या मोग-यात सरकीव मजी झालं!”
“येवस्तीत हं!!”
“काळजीच करू नगस!”
नंद्यानं आपला मोर्चा नांगरटीतून पुढं वळवला. वाकत-वाकत, बि-या धनगर जिथं झोपला होतं तिथं तो गेला आणि खाली बसला.
बि-या धनगराच्या पायथ्याला बसलेलं कुत्रं, चाहूल लागताचउठून उभं राहिलं. पुर्वानुभवानुसार खिशातून आणलेल्या भाकरीतील चतकोर तुकडा नंद्यानं त्या कुत्र्यासमोर फेकला.
जेवढीभाकरी कुत्र्यापुढं टाकली होती तेवढी त्यानं खाऊन टाकली. पण ते कळाखाऊ कुत्रं तिथून दुर जाईना. नंद्या तिथून उठला आणी खोपीकडं गेला. कुत्रंही त्याच्या मागोमाग खोपीकडे गेलं. पुन्हा नंद्यानं चतकोर तुकडा त्याच्यासमोर टाकला. तो ही त्यानं खाल्ला. पण त्याच्या जवळनं जायला ते ढमय म्हणेना! शेवटी नंद्यानं त्याच्याजवळ राहिलेली सगळीच भाकरी त्याच्या समोर टाकली. तीही त्यानं खाऊन फस्त केली. पण आता मात्र ते नंद्याला सोडून इकडं-तिकडं करू लागलं. नाकानं काहीतरी ते हुंगल्यासारखं करू लागलं. नंद्याला आशेचा किरण दिसू लागला. पण पुन्हा ते काहीतरी हुंगत-हुंगत नंद्याजवळ आलं आणि सवयीप्रमाणं त्यानं एक तंगडं वर करुन नंद्यावर फवारा मारला. नंद्याचे दोन्ही हात एकदम जोडले गेले आणि तोंडातून शब्द उमटले,
“धन्य झालो हं खंडोबाराया! उपकार केलेत आमच्यावर!”
पायानं जमीन उकरल्यासारखीं करुन दिडक्या चालीनं ते कुत्रं शिवारात पशार झालं.
“काय सॉट कुत्रं हाय ह्ये! चावाट, लापाट, झाँड!!” पटापटा समानार्थी उपमा नंद्याला सुचून गेल्या.
“च्या आयला! आकबंद भाकरी खाल्ली आणि वर....” पुन्हा नंद्यानं हात जोडले, “उपकार केलात निदान इथनं लांब तरी गेलात!”
नंद्या पुन्हा बि-या धनगरच्या अंथरुणाजवळ आला. तसं बाजूच्या चगाळात झोपलेलं दुसरं कुत्रं चाहूल लागताच खडबडून उठलं. आता नंद्याजवळ त्याच्यासाठी भाकरी नव्हती. नंद्या खाली बसला. कुत्रं त्याच्याजवळ आलं. बराच वेळ निघुन गेला पण काही केल्या ते कुत्रं काही त्याच्यापासून हलेना.
“काय याक, याक जितराबं बि-यानंबी पाळलेती!” नंद्या तोंडातल्या तोंडात पुटपुटला.
नंद्यानं डोकं चालविलं. बि-या धनगराच्याच अंथरुणावरती त्याच्या शेजारीच तो आडवा झाला आणि झोपल्याचं सोंग घेतलं. त्यानं सहज, उशाच्या बाजूला हात फिरवला. त्याच्या हाताला बि-या धनगराचा पान खायचा बटवा लागला. नंद्याला वाटलं बटव्यात एखादं सुपारीचं खांड तरी खायला घावल. या हिशेबावर त्यानं बटव्यात हात घातला. ‘अंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे’ असच नंद्याला क्षणभर वाटलं. त्या बटव्यात त्याला शंबर रुपये सापडले. आता या पैशावर चार-पाच फिष्टी तर सहज होणार होत्या. पण नंद्यानं विचार केला, ‘नको! हे पैसे घ्यायला नको. कारण बि-या खूप गरीब आहे. निव्वळ उसन्या-पासन्यावरच त्याची रोजी-रोटी चालते हे समद्या गावाला माहित आहे. लहानपणीच त्याचे आई-वडील वारलेले. गावक-यांनीच त्याचा सांभाळ केलेला. हेही नंद्या ऐकून होता. पुढे गावक-यांनीच त्याचे लग्न लावून दिले. पण बिच्या-याचं दुर्दैवं! पहिल्या बाळंतपणातच त्याची बायको वारलेली. त्याच्या मुलाचं, बाळीशाच संगोपन त्यानच केलं होतं. दुखणी-पाखणी रिन काढूनच सहन करत होता. नुकतीच त्यानं किसन्या धनगराची तीसेक मेंढरं अर्धलीनं सांभाळायला घेतली होती. आयुष्यात आपल्याला सुख लाभलं नाही, निदान आपल्या पोराला तरी सुख लाभावं, म्हणुन तो खपत होता. राबत होता. हसा-खेळायच्या वयातील आपल्या पोराला तो त्यापाई वणवण हिंडवत होता. पैला-पै जमवुन हेच शंभर रुपये जमवायला किती कालावधी लागलं असेल याला? मग आपून हे शंभर रुपये घ्यायचे का? छे! नको रे बाबा! आपून यातले फकस्त पन्नासच रुपय घेऊ!’
असं विचार करुन त्याने त्यातले पन्नासच रुपये घेतले. बाकीचे पन्नास तसेच ठेऊन दिले.
नंद्यानं इकडं-तिकडं ते कुत्रं कुठं दिसतयं का ते पाहिलं. ते कुठंच दिसेना. ते कुठंतरी शिवारात लांबवर गुल झालं असावं असा विचार करून नंद्या तिथुन उठला. पैसे खिशात ठेऊन तो मेंढराच्या कळपाजवळ आला. कडेच्याच एका मेंढराला नंद्या गोंजरायला लागला. तो गोंजरायला लागल्यामुळं ते मेंढरूही गपगार उभं राहिलं. तसं गोंजरत, गोंजरत त्याने त्याचे चारी पाय हळूच घट्ट धरले. त्या मेंढराला त्याने तसेच हळूच उचलले आणि तसाच तो पळत नांगरटीत शिरला. केरबा वाटच पहात होता. नंद्या केरबाच्या हातात ते मेंढरू देऊन तसाच आल्या पावली परत फिरला.
केरबा ते मेंढरू घेऊन येलगाराच्या मोग-यात शिरला. तोपर्यंत नंद्यानं दुसरं मेंढरूही तसच पकडलं आणि तो नांगरटीतुन बाहेर यायला लागला. पण, चागाळात झोपलेलं कुत्रं शिवारात गायब झालेलं नव्हतच! ते चागाळातच झोपलं होतं. एकाएकीच ते उठून भुंकायला लागलं.
बि-या जागा झाला. कुत्रं का भुंकायला लागलय म्हणून तो अंथरुणावरती उठून बसला. त्याच लक्ष नंद्याकडे गेलं. चंद्राच्या पंध-या शुभ्र प्रकाशात, आपलं मेंढरू कोणतरी पळवून घेऊन चाललय हे त्याला जाणवलं. शेजारची कु-हाड हातात घेतली नि तो मोठ्याने ओरडला,
“आरं ऽ ऽ को ऽ ऽ ऽ ण ऽ ऽ हा य त्यो ऽऽऽऽ?”
दुस-याच क्षणी तो त्याच्या पाठीमागे लागला. बि-यानं येलगाराचा ताटवा ओलांडेपर्यंत, त्या सर्वांनी चौगुल्याचा पानमळा गाठला. बि-याला पोरांची आख्खी चौकडीच दिसली.
एक मेंढरू नंद्याजवळ होतं तर दुसरं केरबाजवळ होतं! सर्वजण डगर संपवून पांदीनं पळत गावाच्या वाटेला लागली. त्यांच्या पाठोपाठच बि-या धनगरही चौगुल्याचा पानमळा ओलांडून डगरीनं पांदीच्या वाटेला लागला.
कदमाच्या म्हाद्यानं मागे वळून बघितलं. बि-या धनगर पाठोपाठच येत होता. बि-यानं पांदीलाच त्यांना गाठलं होतं. म्हाद्या नंद्याला म्हणाला,
“आता काय खरं न्हाय! गावापातुरबी ह्यो बाबा काय आपल्यास्नी जाऊ देणार न्हाय!” त्यावर नंद्या उतम्याला म्हणाला,
“उतम्या! म्हाद्या, मन्या, रमज्या आन् केरबाला जावदे! आपुन बि-याला हितच आडवू!!”
“आर्, पर त्येच्या हातात काय हाय त्ये बघितलस का? कु-हाड दिसतीया! आन तीबी फरशी!”
“मग काय करायचं?”
“हान धोंडा!!!” असं उतम्यानं सांगताच रस्त्याकडेचा एक धोंडा नंद्यानं उचलला आणि मागं सरकून, जुमानुनच बि-या धनगराला मरला. त्या धोंड्याच्या झटक्यासरशी बि-या आडवाच झाला.
बि-या धनगराच्या छातीवर धोंड्याचा दणका बसला होतं. बि-या धनगर घायाळ झाला. हंबरडा फोडून ओरडू लागला. त्या धोंड्याच्या दणक्यानं त्याच्या पोटातली आतडीच गोळा झाली होती. छातीतून असंख्य वेदना येत होत्या. रक्ताच्या उलट्या तो करू लागला.जणू आपलं काळीज फुटल्याचाच त्याला भास होत होता. तो आपल्या न्हानग्या लेकराला हक मारू लागला.
“बाळीशा ऽ ऽ ऽ ऽ! आरं ऽ ऽ बाळीशा! लवकर ये रं ऽ ऽ ऽ!” त्याचा आवाज क्षीण बनत चालला होता.
“बाळीशा ऽ ऽ ! माझ्या लेकरा ऽ ऽ ! ई की ऽ ऽ रं! मा ऽ ऽ ! आँ हा ऽ ऽ ! मा ऽ ऽ माझ्या छातीवर धोंडा बसलाया१ म्या आता काय ह्यातन जग ऽ ऽ त न्हाय ऽ ऽ ऽ ऽ! आरं ईकी रं लेकरा!”
नंद्याच्या कानावरती बि-याचा हंबरडा पडत होतं. नंद्याला गलबलून आलं ‘काय झालं ह्ये आपल्या हातनं! नंद्याला बि-याचा आक्रोश ऐकवत नव्हता. त्याच काळीज तिळतिळ तुटू लागलं. काय करावं त्येच त्याला सुचना! नंद्या आणि उतम्या रोवलेल्या खुंट्यासारखी तिथच भ्रमिष्टासारखी उभी होती.
“पाणी ऽ ऽ पा ऽ ऽ णी, पाणी, पाणी, पाणी! बि-या पाणी मागू लागला. आता मात्र नंद्याला रहावेना. चैन पडेना!
नंद्या आणि उतम्या बि-याजवळ आले. त्यांनी पाहिलं बि-यानं रक्ताच्या उलट्याच उलट्या केल्या होत्या. तो जायबंद झालं होता. फुफुट्यात हात घासत होतं टाचा खुडत होतं. मध्येच गप्प होऊन पुन्हा पाणी मागत होता.
“बाळीशा पाणी दि की! रं! हिकडं म्या ऽ ऽ म ऽ ऽ मरा ऽ ऽ यला लागलू ऽ ऽ या! आन त्वा तिक ऽ ऽ डं का ऽ ऽ य कर ऽ ऽ तुया ऽ ऽ स!”
बि-या गहिवरत होता. पाणी मागत होता. आपल्या लेकराला तो बोलवत होता. पण त्याच्या लेकराला तरी काय माहीत असणार? आपला बाप कुठल्या अवस्थेत सापडलाय ते. दिवसभर मेंढरं हिंडवून-हिंडवून बिचारं त्येबी थकुन गेलं होतं! त्यामुळं त्याला गरग झोप लागली होती.
नंद्याला वाईट वाटू लागलं. नंद्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. त्याचं डोकं मनस्तापानं पोखरलं होतं!
‘काय बिच्या-यानं वाकडं केलं होतं? का आपण त्याला ही सजा दिली आसलं? फक्त फिष्टीसाठी? जिवाच्या चैनीसाठी? ह्यातनं जर बि-या मेलाच तर? बाळीशा अनाथ होणार? त्याच्या आयुष्यभराच्या दुःखाला आपुनच कारणी ठरणार!’
बि-याचा आवाज खोल खोल होत चालला होता. तो पाणी-पाणी करत होता. पाणी मागत होतं नंद्या जवळ असूनही भुलल्यागत झाला होता. त्याला कुठूनतरी पाणी आणून बि-याच्या मुखात पाण्याचे चार थेंबही घालायचे सुचत नव्हते!
‘पाणी-पाणी’ करत बि-या शेवटी निपचिप पडला. ते पाहून नंद्या भानावर आला. त्याने आपले डोके दोन्ही हातांनी गच्च दाबुन धरले.
‘आपण शेवटच्या क्षणीही बि-याला पाणी पाजू शकलो नाही’. या विचाराने त्याला पुन्हा मनस्तापात फेकलं.
शेजारच्या उतम्यानं नंद्याला सावध केलं. आणि मग ती दोघही रमाट्यानच पळत गावाकडे आली.
नंद्याच्या खोलीसमोरच मन्या, कर्ब आणि रमज्या उभी होती. उतम्या आणि नंद्या सुखरूप परत आलेली पाहून त्यांचा जीव भांड्यात पडला.
नंद्या अजुनही विचारांच्याच तंद्रीत होता. कुलूप काढून झटकन खोलीत शिरावं, हे त्याच्या डोक्यातच शिरत नव्हतं! त्याच्या डोक्याचा भुस्सा झाला होता. नजरेसमोर टाचा खुडत ‘पाणी पाणी’ करणारा बि-या त्याला दिसतं होता! ‘आजपास्न ‘फिष्ट’ बंद! आयुष्यात वाईट एवढं काय करायचं न्हाय!’ असा विचार त्याच्या मनात घोळत होता.
नंद्याची ती अवस्था पाहून उतम्या खवळला. दबक्या आवजातच तो नंद्यावर खेकसला,
“लेका काढ लवकर कुलुप आणि उघड की खुली!”
नंद्या भानावर आला. त्यानं किल्लीसाठी खिशात हात घातला आणि एकदम चपापला. पुन्हा चाचपून किल्ली त्यानं बघितली. पण किल्ली काही त्याला सापडेना! केरबानं विचारलं,
“काय झालं रं?”
“घात झालं लेका! किल्ली बि-या धनगराच्या हातरुनावर पडली!”
“पडली तर पडू दे. चल आमच्या छपरात मेंढरं बांधू!” असं उतम्यानं म्हणताच नंद्या म्हणाला,
“आपून समदी फसलो लेकांनो!!”
“त्ये कसं काय रं?” रमज्यानं विचारलं. आरं, किल्ली बि-या धनगराच्या हातरुनावर पडली त्याचं काही न्हाय रं! प्र त्या किल्लीवर माझं नाव हाय रं!!!”
हे ऐकल्यावर सर्वांनीच कपाळावरती हात मारला.
******************************************
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप मोलाची आहे. वरील कथेवर आपण जरूर प्रतिक्रिया द्या.आपली प्रतिक्रिया हेच लेखकासाठी प्रोत्साहन व साहित्यिक बळ आहे.

Saturday 1 May, 2010

“तो”


मी नटून थटून बाहेर पडले
आणि ‘तो’ अचानक आला.
‘तो’ येण्याची चिन्हे असती दिसली
तर मी आनंदाने स्वागत केले असते
‘तो’ असा अचानक आला
म्हणूनच होता फार राग आला.
त्याच्या जाण्याची वाट पाहिली
पण ‘तो’ जायलाच तयार नव्हता
त्यावेळी मी काय करणार ?
काहीच इलाज चालत नव्हता
कारण तो तर ‘वळवाचा’ पाऊस होता.
कवयत्री-सौ प्रतिभा पाटील

Sunday 25 April, 2010

धडपड


लेखक-विजय तानाजी शिंदे

एम्. एच्. ओ. बारा छत्तीसनं मंगळवेढा सोडला आणि रस्त्यावर वेग पकडत धावू लागला. ट्रकच्या पाठीमागं हौदात ज्वारीची पुती भरली हुती. लोडाचा माल. ट्रक दम खावून दम खावून चढ चढायचा. डायवर गिअरचं दांडकं धरून पटाटा गिअर बदलायचा. ट्रक गचकं खात खात दढ पार करायचा.
उन्हाळ्याचं दिस. गरम हवेचे झोत दरवाजातनं आत घुसायचे. आदिच इंजनामुळं केबिनमधली हवा गरम झाल्याली. त्यात गर्दी, तीन बाया, दोन गडी किन्नर आणि डायवर. अशी सात माणसं दाटीवाटीनं बसल्याली. किन्नरची कापडं तेलानं काळीमिट्ट झाल्याली. लुकड्या गडी चार महीनं झालं ट्रक बदलून या ट्रकाबरोबर आलेला. लय आडचण व्हाया लागली म्हणुन त्येनं दुनी पाय भाहीर काढलं. त्वांड बी भाहीर काढलं. हवेचा झोत आला. घामानं भिजलेल्या अंगावरनं गेला, तसं गार वाटलं. हवेचं आसं झोत अंगावर घ्याला बरं वाटायचं. डायवरला लय उकडाय लागलं. गाडीतल्या बायकाकडं आदनं-मदनं बघायचा. बायका डोळ्यात डोळं घालून हसायच्या. तसा डायवर गाडीचा वेग वाढवायचा.
दोन दिस झालं, आंघुळीचा पत्ता नव्हता. अंगावरचा घाम वाळत हुता. काळं कुळकुळीत आंग, दात पांढर शिपट, दाढी वाईसी वाईसी वाढल्येली. जागून जागून लाल झाल्यालं डोळं. नाक, गाल, कपाळावर तेलकाट जमल्यालं. इकडं-तिकडं बघत टिरिंगचं चाक फिरवत हुता. पाय सारखं वर-खाली करुन क्लच, ब्रेक अँक्सिलरेटरची दांडकी दाबत होता. सराईत हातानं गिअर बदलत हुतं.
डायवरच्या पाठीमागं दोन माणसं. एक धोतार, बंडी घालून बसलेला. दुसरा मळकटलेल्या पँट शर्टात हुता. त्येनला लागुनच तीन बाया. सावळ्या रंगाच्या तीस-पस्तीशितल्या. इकीचं आंग रेखीव आणि दणकट. डायवरच्या सराईत हाताकडं बघत हुती. डायवरची नजर घुटमळत तिच्याकडं जायाची तशी ती बी सरावलेल्या नजरनं त्याच्याकडं बघायची.डायवरला बी गुदगुल्या व्हायच्या. मनात म्हणायचा, ‘आयला बरं झालं, मिरजंपातुर इरंगुळा झाला. टेप सुरु केला. इरसाल लावणी – ‘पाडाला पिकलाय आंबा’, लावणीचा इशारा डायवरनं केला. तिला बी कळला.
गाडीत बसल्याली बाया-माणसं एकमेकांच्या वळकीची हुती. मिरजला जायाचं हुतं. दोन-तीन बारकी गटूडी पायात ठिवली हुती. गड्यांच्या हातात पटकाराच्या पिशव्या हुत्या. मांडीवर घिवून बसल्याली. लावणीचा आनंद घेत ट्रक बरोबर सगळी रानं तोडत
हुता. झाडं मागं पळत हुती. पुढनं आल्याल्या गाड्या ‘घ्वांय ऽ ऽ ऽ’ करत मागं जात हुत्या. मागनं येणा-या जीपा, टॅक्स्या, मोकळं ट्रक, यसट्या, टॅम्पो, बारक्या गाड्या ........ ट्रकला वलंडून म्होरं सरकत हुत्या. टायरांचा ‘चारं ऽ ऽ ऽ रं, चाट ....... चाट’ आवाज याचा. आंतर तुडून लांब जात बंद व्हायचा. म्होरं गेल्यालं वाहन बी कुठंतरी गुडूप व्हायचं.
बारकी-चिरकी गावं मागं पडत हुती. रस्त्याच्या कडच्या पाट्या दिशा दाखवत हुत्या. सावधान करत हुत्या. उजवीकडं वळण असल्याली पाटी दिसली. डायवरनं सराईत हातानं टिरिंग वळवलं आणि वेग वाढवला. रस्त्याकडच्या नंबरवर लायटीचा उजीड पडला. सांगोला एक किलोमीटर वर असल्याची सूचना दिली. ‘खाडा ऽ ऽ ऽ .....डं’ ट्रक थरथरला. पावसानं भिजलेल्या शेळीसारखं आंग झाडलं. आणि स्पीड बेकर पार केला. नव्या उमेदीन सांगोल्यात घुसला. ट्रकचा वेग थोडा कमी झाला. डायवर पुढच्या परवासाचं येळापत्रक ठरवू लागला. जेवाण कुठं करायचं? च्या कुठं प्याचा? आता किती वाजल्यात? आपण किती वाजंपातूर पोहचू? .......... डोक्यात इच्यार, चकराच्या येडया बरोबर येडं काढायं लागलं.
वाहनांची वरदळ वाढाय लागली. सांगोल्यात थांबा जवळ येत हुता. डायवरला वाटलं आजुन दोन-तीन माणसं घिवून बोकड कमाईत भर टाकावी. रातरीचं जेवण तरी भाहीर पडंल. या इच्यारात किन्नरला हाक मारली.
“बारक्या”
“काय वस्ताद”
“आरं, जेवण कुठं करायचं?”
“तुमी म्हंचाल तिथं, म्या काय सांगू?”
“भडव्या, तुला काय सुचत न्हाय का?” डायवरनं बारक्याला पदवी बहाल केली. त्यो पुढं म्हणाला, “किती वाजल्यात बघ बरं?”
बारक्यानं डायवरच्या हाताकडं बघितलं आणि म्हणाला,”घड्याळ कुठं ठिवलसा?”
“डावरमधी टाकलंय.”
बारक्या ट्रकात बसलेल्या माणसाकडं बघुन म्हणाला,”पावनं टायम काय झालाय?”
पावण्यानं मानकुट हालवलं. “साहेब घड्याळ न्हाय वं.”
“बरं-बरं आसू द्या.” डायवर म्हणाला. त्याला बायकांची थुडी गंमत करावी वाटली. त्येच्याकडं बघत म्हणाला,”तुमच्याकडं न्हाय वी घड्याळ?”
एकजण म्हणाली, “न्हाय. गरीबाची थट्टा करताय व्हय. आमच्याकडं कुठलं आसतया वं. रोजगार करुन, भीक मागुन आमी खाणार. तुमच्याकडचं बघुन सांगा की.”
पाठीमागचा माणुस पुढं सरकत म्हणाला, “व्हय-व्हय सांगा की, आमी मिरजत कवा पोचतुया ते बी कळू द्या.”
बारक्यानं चावी लावली. डावर उघडला. पैशाच्या नोटावरचं घड्याळ उचललं आणि म्हणाला, “आठ वाजल्यात वस्ताद.”
“साडेनव वाजता शिरढोण मधी पुचू का?” वस्तादनं प्रश्न केला.
“व्हय.”
“मग आपण तिथंच जेवाण करू या.” जेवणाचा टाईम वस्तादनं ठरविला. पुन्हा म्हणाला, “इथं च्या प्यायचा का?”
“व्हय व्हय पिवया की.” बारक्या खुश झाला. घड्याळ डावरमधी टाकलं. पैशावर नागासारखं इटूळ मारुन घड्याळ बसलं.
पाठीमागचा माणुस पुढं सरकत म्हणाला, “किती वाजल्यात म्हणालासा?”
“आठ वाजल्यात.” बारक्यानं उत्तर दिलं.
“मग आमी मिरजत कवा पोहचू?”
“बारा-एक वाजत्याल बघा.” डायवर म्हणाला.
“वाईच ट्रक पळवा की.”
“का तांदळाला जायाचं हाय काय?” डायवर खेकसला. तसा तो माणुस माग सरकला आणि बारीक आवाज करीत म्हणाला, “जरा गडबड हुती वं.”
डायवर जरा सबुरीन घेत म्हणाला, “न्हाय वं मागं माल गच्च भरलाय. आन रस्ता तर बघा की किती खाचखळग्याचा हाय.”
“ते बी खरचं हाय म्हणा.” एक माणुस म्हणाला. दुस-या माणसानं खळग्यांना सम्मती देत मान हालवली. “आसु द्या, आसु द्या सावकाश जावू दी.”
दोघं बी माग टेकली. आपापसात काय-बाय बडबडली. वस्तादला एवढंच कळलं की, ही पारध्याची भाषा हाय. गाडीत चार-पाच हजार रुपये हुतं. त्याला जरा काळजीचं वाटली. मनात म्हणाला, “आयला पारध्याची जात लय वाईट, मार दिवून माल घिवून जायाची.” इच्चार केला. ‘म्या बी काय कमी न्हाय. एका एकाच्या उरावर बसीन. न्हाय तर ह्येंच्यात जीव कुठं हाय. माझं आंग नुसतं रेड्यासारखं हाय. एका एकाच्या नरडीचा घोटच घिन.... पर बायाचं काय करायचं?.... बोंबलाय लागल्या आणि आसपासची माणसं गोळा झाली तर?’
वस्तादनं मागं वळून बघितलं. बायनं काच्चदिशी डोळा घातला. तो गडबडलाच. मनातलं भ्या रस्त्यावर पडलं आणि त्येच्यावरनं ट्रक गेला. भ्या रस्त्यावर चिटकून राहिलं आणि वस्ताद बायकांचा विचार कराय लागलं......
वस्तादला गप्प बसवना. त्यानं इचारलं, “मिरजला कशाला चाललाय?”
“आमचा तिथं यक तळ हाय. तिकडं चाललूय.” एकीनं उत्तर दिलं.
वस्तादनं पत्त्याच्या पानासारखा दुसरा प्रश्न तिच्या पुढयात टाकला, “काय काम हाय वो.........?”
“व्हय.”
“कंच म्हणायचं?”
“पावण्याची म्हातारी मिलीया.” एका माणसानं सांगितलं.
“आरा ऽ ऽ ऽ रां वाईट झालं.” वस्तादला वाईट वाटलं.
“कशाचं वाईट. पिकल्यालं पान गळणारच की वो.”
“आवं पर तुम्हाला किती पळाय लागतंय बघा की.” वस्ताद म्हणलं.
“मग काय करायचं? नाती जोडल्यात न्हवं. ही माझी बायकु.” ट्रक चालू झाल्यापासनं गप्प बसल्याल्या बाईकडं हात करत तो माणुस पुढं म्हणाला, “तिची आयच मिलीया. मजी माझी सासू. मग जायायचं पायजी वो.”
“तर तर गेलंच पायजी. जिच्या पोटातनं आपण जग बघाय आलू, जिन आपल्याला डोळं दिलं, त्या डोळ्यानं तिला बघितलाच पायजी वं.” वस्ताद म्हणालं.
“काय बघितलं पायजी आन काय न्हाय. गांव - न् - गांव पालथा घालून जीव आंबून गेलाय बघा. खायला आनं मिळत न्हाय का प्याला पाणी. सारखं आन्नाच्या पाठीमागं पळावं लागतयं बघा. धडपड करावी लागत्या. पायपीठ करावी लागत्या. धडपडून जीव कासावीस हुतुया. तरीबी प्वाट भरत न्हाय.” त्या माणसानं आपल्या जीवनाचं पान वस्तादपाशी उघडलं.
“खरंच पण ही दिस काय आसच रहात्यात का? बदलत्यात की.”
“कसं बदलायचं न काय”
“का वं ?” वस्तादन पुन्हा प्रश्न केला.
“देव काय आम्हांला आभाळातनं पैसं पाठीवनाराय?”
“पर तुमी चार पैसं गाठीला बांधून एका जाग्याला का रहात न्हाय?” वस्तादनं प्रतिप्रश्न केला.
फाटल्याली कापडं दाखवत तो माणुस म्हणाला, “गाठ मारायला कापडं तर धड पायजीती की, ही बघा सगळं भसकं हायतं कुठनं पैसं याचं आणि कुठं ठेवायचं.” त्येनं गारहाणं चालूच ठेवलं.
वस्ताद ईचार कराय लागला. “आयला खरंच या माणसांच कसं व्हायचं....आणि म्या बी हाय, गरिबांच्या बायावर डोळा ठीवतुया. चुकलं माझं देवा. पण ती बी किती आगाव हाय. डोळा घालत्या. जरा तरी भान असावं की, आपण कशासाठी चाल्लूया, कुठं चाल्लूया....आमचं काय रोजचं रडगाणं...आज हिथं उदया तिथं...जगायसाठी.पोटापाण्यासाठी नुसती धडपड..... घरापास्ना बायकापासनं, पोरापासनं महीनं- महीनं भाहीर रहावं लागतं. मग मनाला बरं वाटायसाठी वायसं धडपडून बाघायचं....
सांगोला आलं. टीरींग गरा गरा फिरवून वस्तादनं गाडी बाजूला लावली.फुडनं वाहनं येत हुती. थांबत हुती. जात हुती. त्यानं माग-फुडं बघितलं. गाडी नीट लागल्याची खात्री केली आणि उतरून किन्नर साईडला आला.
“म्या अगुदर च्या पिऊन इतु.मग तु जा.” वस्ताद बारक्याला म्हणाला.
“बर बर”
“पावनं तुमास्नी बी च्या पाणी करायचं आसलं तर करा.दहा मिनटं गाडी थांबणार हाय.” असं म्हणत वस्ताद हाटेलकडं वळलं.
पारध्याची माणसं उतरली.च्या पाणी करून लगीच माघारी आली.त्येंच्या बरोबर दोन बाया आणि एक माणुस नवीनच आला. किन्नरला म्हणाली, “हेन्ला बी मिरजला याचं हाय.”
“आवं पर जागा न्हाय. राच्ची येळ हाय. झ्वाप येणार. अवगाडून कुठंपातुर बसायचं?” बारक्या म्हणाला.
“वायसी जागा करा की! लय अडचण हाय बघा. येळत पोचलं तर म्हातारीचं त्वांड बघाय मिळल.” काकुळतीला येत एकजण म्हणाला.
“बरं बरं, थांबा.वस्ताद इवूद्यात.”
वस्ताद च्या पिऊन, पानानं त्वांड रंगवून आलं.कराकरा पान चावत म्हणालं,”बारक्या, जा च्या पिऊन ये रं बिल दिऊन आलुया. पाच रुपये घे.तुला काय घ्याचं असलं तर घी.”
बारक्या खुश झाला.त्यो पाच रुपये घेत म्हणला, “ वस्ताद ह्येंची आणखी तीन माणसं आल्याती.त्येन्लाबी मिरजला जायचं हाय.”
वस्ताद त्यांच्याकडं वळून म्हणालं, “ दुसरया टरकातनं ईवू दया की. बसायला अडचण हुत्या.”
“बघा की सायब. राच्ची येळ हाय डायवर घेत न्ह्यायती.येळत पोचाय पायजी. माणसं पाखरावाणी वाट बघत असत्याली. वायसं सरकून बसतु की.” पारध्यांनी गयावया केली.
“आवं पर.....”
“न्ह्याय... न्ह्याय आसं म्हणू नगासा.”
“व्हय व्हय, बसतु की”
“मग इवू दयात” वास्तादनं परवानगी दिली.
बारक्या च्या पिवून आला. गुटक्याची एक पुडी वस्तादकडं ढकलली.
वस्ताद म्हणलं,”आरं वा, लयचं हुशार हायसं की.”
बारक्याला बरं वाटलं, वर चढला. टपावर गडी माणसं बसल्याली. केबिनमधी पाच बायकाच. बारक्याला बी नीट जागा मिळाली. वस्तादनं स्टार्टर दाबला. ‘घुर्र ऽ ऽ ऽ’ इंजनानं आवाज दिलं. तवर एक माणुस पळत येत म्हणाला, “मिरजला जायाचं हाय.”
वस्तादला वाटलं आजून पंधरा-वीस रुपये मिळतील. गिअरच्या दांडक्यावर हात ठेवत म्हणालं,”वर बसणार का?”
“म्या एकटाच?”
“न्हाय. आजून दोन-तीन हायती की.” बारक्या म्हणाला.
“मग बसतु की.” गाडयांची वाट बघत बसलेल्या त्या माणसानं लगीच कबुल केलं.
“मग या.”
वस्तादनं गिअरच्या दांडक्यावरचा हात काढला. टिरींग मोकळं सोडलं. ब्रेक दाबून धरला. नवा माणूस वर चढला. टपावर आपली पिशवी सांभाळत बसला. वस्तादनं ब्रेकवरचा पाय काढला. क्लच दाबून गिअरचं दांडकं वडलं. क्लच हळूहळू सोडलं. गाडी पुढं सरकू लागली. वेग धरू लागली.
स्पीड ब्रेकर आला. रेल्वेचं फाटक पार केलं.शिटी फुकत पोलीस आडवा झाला. त्येला बघून वस्तादनं शिवी हासडली. “हेच्या मायला.... डोमकावळा आला वाटतं.”
“का रं माणसं बसवतुस का काय?”
“न्हाय सायब.”
“न्हाय काय आत कोण हाय? आयला नुसत्या गवळणीच बसवल्यात्या....चल उतर खाली.”
वस्तादनं उगच पिच-पिच नको म्हणून दहा दहाच्या तीन नोटा टेकवल्या.
पोलीस नोटांकडं बघत म्हणाला, “ आं....नुसतं तीसच? आमी काय देव हाय हुई निवद दाखवायला?”
“न्हाय सायब....आज धंदाच झाला न्हाय.”
“सगळी आसं म्हणाय लागल्यावर आमच्या पोटापाण्याचं काय व्हायचं?”
पोलिसानं पोटावरनं हात फिरवला आणि पिण्यासाठी बाटलीचा इशारा केला.
वस्तादनं आणखी एक दहाची नोट त्याच्या हातावर टेकवली. तसा तो म्हणाला, “........आता कसं! जावू दी.”
वस्ताद पान थुंकला. पोलीसानं चाळीस रुपयाला थुका लावला. त्यानं बी एक लांब-लचक शिवी दिवून ट्रक पुढं काढला.
सुत गिरण, सांगोला एम्. आय्. डी. सी., कमळापूर आणि बारकी-चिरकी गावं, वस्त्या मागं टाकत वस्ताद ट्रक रेमटू लागला.
नव वाजत आल्या. जुनोनी पार केलं आणि ट्रक गांव सोडून रस्त्याला लागला. वाकडी – तिकडी वळणं घेवु लागला. पुढनं येणारी वाहनं लायटी कमी-जास्त करायची. कसलं तरी इशारं व्हायचं. वस्ताद कवा तरी हात भाहीर काढायचा, कवा तरी शिवी द्यायचा.
पुढनं टॅक्सी वेगानं याय लागली. लायटीचा मोठा लाट झोत तोंडावर पडला. सगळं उजळून निघाल्यासारखं झालं. डोळ्यापुढं अंधारी आली. वस्तादला राग आला.वस्तादनं ट्रकचं कट हानला. ट्रक टॅक्सीच्या अंगावर धावून गेल्यासारखा गेला. पुन्हा कट मारुन रस्त्यावर नीट आला. हिंदकोळं बसलं. डुलक्या घ्याय लागल्याल्या बाया जाग्या झाल्या. टॅक्सी डांबरी सोडून खाली गेली.वस्तादनं ट्रकचा वेग कमी केला.त्वांड बाहीर काढून टॅक्सीवाल्याला शिवी दिली. गिअर बदलून वेग धरला.
बायका कावरया बावऱ्या झाल्या. एक म्हणाली, “ आवं हळू चालवा की.”
“काय हळू चालवा. सावकासच चालवतुया की, सालं लायटचं बंद करत न्हायत. आसं केल्याबिगर त्येंची जिरत न्ह्याय....” वस्ताद बडबडाय लागलं.
वस्ताद वैतागला हुता. एवढ्यात टपावर धडपड झाली. टप आपटल्यासारखा, बडवल्यासारखा आवाज झाला. “बारक्या वर बघ रं काय कालवा चाललाय....का कुस्त्या कराय लागल्यात?”
बारक्या दरवाज्याच्या बारला धरून उभा राहीला. वर सगळा अंधारच. काय दिसत नव्हत. अंदाजानच तो म्हणाला, “पावनं काय चाललंय? गप्प बसा की.”
“ व्हय व्हय तेच करतुय. झोपायची तयारी कराय लागलुय. तुमच्या वाकडया तिकड्या चालीवण्यात पडलू न्हवं.”
“बरं, झोपा नीट.”
“हां... व्हय व्हय”
बारक्यानं आंग आकाडलं आणि आत बसला.शिरढोण अजून वीसेक किलोमीटर हुतं.नव वाजून गेल्यालं.पोटात कावळं वरडाय लागल्यालं. कवा जेवाय बसीन झालं हुतं.बारक्याला घराकडची आठवण झाली.घरात असतु तर इदुळा जेवाण झालं असतं. हातरुनावर कलंडून असतु.घराकडची आठवण झाली तसं बारक्यानं आणखी बारीक त्वांड केलं. वस्तादला त्येची दया आली आणि म्हणालं,
“कारं बारक्या काय झालं?”
“कुठं काय...काय न्ह्याय.”
“एवडं बारीक त्वांड कशापाय केलंयस. घराकडची आठवण इत्या?”
“व्हय...न्ह्याय-.न्ह्याय.”
“व्हय...न्ह्याय-.न्ह्याय काय? येत आसली तर सांग की?”
बारक्याला लय वाटलं वस्तादला सांगावं आय ढोरामागं पळून-पळून दमत्या. बा दुसऱ्याच्या शेतात रोजंदारी करतुय. धाकली भण लग्नाला आल्या. लगीन कराय पायजी. गावातली टवाळकी पोरं डोळा ठीऊन अस्त्यात. जीतलं माणुस तिथं गेलं म्हंजी कसं. चार पैसं मिळवाय भाहीर पडलू.धडपडाय लागलू. निस्ता धडपडतूया.... हातात काय बी घावात न्हाय. वस्तादचीबी लय रडगाणी.तिथं आपलं आणि कशाला गा... आणि आपलं रडगाणं त्येंच्या फुडं गाऊन काय उपिग हाय का? बारक्या गप्प बसला.
वस्तादला रहावलं न्हाय. त्येला बारक्याकडं बघून धाकट्या भावाची आठवण झाली. बारक्या बी तसाच. त्यांनी त्याला मायेनं विचारलं, “भुका लागल्यात हुई रं?”
“व्हय.”
“थांब अर्ध्या तासात शिरढोणला पुचू. वळकीचा धाबा हाय.पैसं बी कमी पडत्यात अन जेवाण फसक्लास असतंय.आज मटण खाऊ या का?”
बारक्याला बरं वाटलं पण वस्तादच्या पुढं कसं बोलायचं म्हणून म्हणाला, “ तुमी म्हणाल तसं”
“तुमी म्हणाल तसं काय? आज मटण खाऊयाचं. लय दिस झालं म्या बी खाल्लं न्ह्याय.”
वस्ताद बोलायचं थांबलं आणि बारक्याचं मन घराकडं कोकरावाणी दुडक्या मारत पळालं. भनीच्या, बाच्या आयच्या भोवती घुटमळाय लागलं. आयनं हातानं भाजल्याली जुंधळ्याची भाकरी. त्यावर कडक पापुडा आठवाय लागला.... त्वांड बाहीर केलं आणि डोळ्यातनं आल्यालं दोन पाण्याचं ठिपसं पुसलं. डोळं निवळलं.
निवळलेल्या डोळ्यांना रस्ता स्पष्ट दिसू लागला.मागं फुडं वाहनं न्हवती. जेवायसाठी घोरपडीचा फाटा.पुन्हा नागज, कुची आणि शिरढोण एवढं अंतर हुतं. कवठेमहांकाळच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या बोर्डानं कवाच स्वागत केलं हुतं. एखाद दुसरं वाहन
‘ढार ऽऽऽऽ ढार ऽऽऽऽ‘करत कुतत जात हुतं.
साडेनव वाजल्या असतील. वरनं माणसं धाड धाड आपटाय लागली. वस्ताद म्हणालं “बारक्या का बोंबलत्याती बघ बर?”
बारक्यानं पुन्हा त्वांड भाहीर काढलं आणि इच्चारलं, “ काय झालंय वं?”
“लघवीला जायचं हाय.”
वस्तादनं वैतागून ट्रक कडला लावला. केबिनमधली लायट लावली.बारक्यानं उढी टाकली.वरची तीन माणसं खाली आली.
बारक्या म्हणाला,” दुसरयालाबी खाली घ्या की, ते बी उरकत्याल.”
“त्यो व्हय शांत...झोपलाय. आमाला म्हणाला मिरजत गेल्यावर उठवा.” एका पारध्यानं सांगितलं. बारक्या माणसांच्या हातात पिशवी बघून म्हणाला, “ पिशवी कशाला खाली आणतायसा?”
“खाली ठिवतू की झोपायला आडचण हुत्या.”
“बरं – बरं आणा मी घितू.”
“तुमी कशाला घेतायसा मीच ठिवतु की.”
“तुमची मरजी.”
तिघंबी पारधी आत केबिनमधी घुसलं. बायकास्नी उठवलं. खाली उतरवलं. एकानं पिशवीत हात घातला. लांबडा – लचक कोयता भाहीर काढला. कोयत्याचं पात लायटीच्या उजिडात चकाकलं. वाघाच्या जिभीसारखं लप–लपाय लागलं. रक्तासाठी आसुसलं. काय कळायच्या आत वस्तादच्या नरड्यावर कोयता टेकला.
एकजण म्हणलं, “घडयाळ आन पैस काढ.”
“तुमच्या बाचं काय देन हाय काय?” वस्ताद म्हणाला.
नरड्यावरनं पातं घसरलं आणि ऊसाच्या बुडात हानावं तसं वस्तादच्या बावट्यावर घुसलं. रगात भळ-भळाय लागलं. बावट्याचं मास लोंबकळलं. वस्तादला काय करायचं कळंना. हात घामानं वलकिच झालं. काखत घामाच्या धारा लागल्या. कपाळावर दरदरून थ्यांब गोळा झालं.
चावी काढून डावर उघडला. घड्याळ आणि पैशाचा एक एक पुडका काढून देवू लागला. पैसं देताना वस्तादला मालक, घर, घरातली माणसं, धाकटा भाव, बायका-पोरं. म्हातारी आय-बा दिसाय लागलं पण इलाज नव्हता.
पारध्यांनी पैसं, घडयाळ खिशात भरलं आणि वस्तादला खाली ढकलत म्हणाली, “ चल उतर खाली.”
वस्ताद उतरलं. तिघं पारधी बी उतरली. रस्त्यावर चिटपाखरू नव्हतं. रातकिडं किरकिराय लागलं हुतं. लांबून वाहन येत असल्याचा प्रकाश पडला. वस्तादच्या जीवात जीव आला. पारध्यांनी गडबड केली.डायवर-किन्नरला ढकलत रस्त्यापसनं लांब आत न्हेलं. बारकं टेकाडं लागलं. टेकाडाच्या आडोशाला गेली. मार दिला. वार झालं. बारक्या कवाच थंड झाला हुता. मगाशी डोळा घातलेल्या पारधीनीनं मोठा दगड उचलून वस्तादाच्या डोसक्यात घातला. ‘काच्च’ आवाजात डोसक्याचा चेंदा-मेंदा झाला. पायांची धडपड झाली. माती उधळली. धडपडणारं पाय शांत झालं.

*********************************************************************